रस्त्यांची दुरवस्था : महसूल प्रशासनाने केला आठ रेतीघाटांचा लिलाव तुमसर : तुमसर तालुक्यातून जिवनदायीनी वैनगंगा, बावनथडी नद्या वाहतात. उच्च दर्जाची रेती नदीपत्रात असून या रेतीचा प्रचंड मागणी शहरात आहे. तुमसर तालुक्यात १८ रेतीघाटापैकी आठ रेतीघाटांचा राज्य शासनाने लिलाव केला. इतर १० रेतीघाट केवळ कागदोपत्री बंद आहेत. या रेतीघाटातून रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासन थातुरमातूर कारवाई करून मोकळे होतात. परिणामी रस्त्यांची दूरावस्था झाली आहे.वैनगंगा तथा बावनथडी नदीपात्रात उच्च दर्जाची पांढरी शुभ्र, पिवळसर दाणेदार रेती मुबलक आहे. प्रचंड रेती साठ्यामुळे रेती कंत्राटदार तालुक्यातील रेतीघाट खरेदी करतात. या रेतीची उपराजधानी नागपूर ही मोठी बाजारपेठ आहे. महसूल विभागाने सन २०१६ या वर्षात आठ रेती घाटांचा लिलाव केला. कोट्यवधींना ही रेतीघाट खरेदी करण्यात आले. यात चारगाव, बाम्हणी, तामसवाडी सि., मांडवी, वारपिंडकेपार, आष्टी, लोभी व देवनारा येथील रेतीघाटांचा लिलाव झाला. येथील रेतीघाटात रेतीचा प्रचंड साठा आहे तर उमरवाडा, सुकळी दे, पांजरा, बपेरा, घानोड, ढोरवाडा, माडगी, चांदमारा, सक्करदरा या रेतीघाटांचा लिलाव झाला नाही. ही रेतीघाट अयोग्य मानली गेली. घाटात रेतीसाठा उपलब्ध नाही.रेतीघाट लिलाव झाले नाही त्या रेतीघाटातून मात्र नियमित मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती आहे. महसूल प्रशासन कारवाई करणे, पुन्हा उपसा सुरू होतो. ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांची कारवाई येथे संथगतीने दिसते. क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. यामुळे रस्त्यंची अगदी चाळण झाली आहे. रेतीघाट असलेली गाव रस्ते खड्डेमय झाली आहेत. अनेक आंदोलने होतात, परंतु परिस्थिती मात्र जैसे थेच दिसून येत आहे. रेती उपस्याचे अतिशय कडक नियम आहे, परंतु नियमबाह्य रेती उपसा सुरू आहे. महसूल प्रशासन येथे हतबल झालेले दिसते.नदी पात्रात सीमांकन केले जाते, परंतु दररोज सीमांकन पाहण्याकरिता महसूल अधिकारी तथा कर्मचारी जाऊच शकत नाही. सीमा कुठून कुठपर्यंत आहेत हे सर्वसामान्यांना कळत नाही. नदीपात्र गावापासून दूर असते. कंत्राटदार हे वजनदार व श्रीमंत व्यक्ती असतात त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी तक्रार देण्याकरिता ग्रामस्थ पुढे येत नाही. महसूल प्रशासनाचे अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखनीत ६ घाटातून वाहतूक सुरूलाखनी : तालुक्यातील मऱ्हेगाव, पाथरी, भुगाव, नरव्हा, पळसगाव येथील रेतीघाट सुरू आहेत. त्यांची ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत मुदत आहे. मिरेगाव रेतीघाटाला गिट्टी उत्खननाची परवानगी ६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आहे. आज तहसिलदार राजीव शक्करवार यांनी मिरेगाव रेतीघाटातून रेतीचे उत्खनन व अवैध वाहतुक करीत असताना ९ ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर मालकावर कारवाही केली आहे.तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन केले जाते. रेतीचे रॉयल्टी व नियमानुसार वाहतुकीचे तहसिल कार्यालयाचे व पोलीस विभागाचे लक्ष असते. गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे मऱ्हेगाव, भुगाव, नरव्हा येथील रस्ते खराब झाले आहेत. लोकांना त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी व पहाटेला अवैध वाहतुक चालत असते याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)
१० बंद रेतीघाटातून नियमबाह्य रेतीचा उपसा
By admin | Updated: September 9, 2016 01:38 IST