स्थगिती उठविली : मागणी निश्चित करण्याचे ग्रामपंचायतींना निर्देशभंडारा : ग्रामपंचायत कर आकारणीत बदल व न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मागील नऊ महिन्यांत एक रूपयाही करवसुली होऊ शकली नाही. राज्य शासनाने इमारतीच्या क्षेत्रफळावरील आकारणी रद्द करून नव्याने भांडवली मूल्यावर कर आकारणी निश्चित केली आहे. त्यामुळे आता गृहकराची आकारणी क्षेत्रफळाऐवजी भांडवली मूल्यावर होणार आहे. सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.ग्रामपंचायत गृहकराबाबत टाकण्यात आलेल्या जनहित याचिकेवरून करावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्यात आली आहे. याबाबतचा ग्रामविकास विभागाचा आदेश जिल्हा परिषदेत धडकला. या निर्णयामुळे एप्रिल २०१५ पासून थांबलेल्या कर वसुलीला पुन्हा सुरुवात होणार आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे आता क्षेत्रफळाऐवजी भांडवली मूल्यावर कर आकारणी करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या काळात शासनाने भांडवली मूल्यावर कर आकारणी करताना सध्याच्या काही पटीने वाढविण्यात येणार असल्याचा आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यानंतरच्या सुधारित आराखड्यात कर आकारणी दुप्पट ते चारपट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २ जानेवारीला काढलेल्या आदेशात नेमकी किती आकारणी होणार, हे स्पष्ट केले होते. भांडवली मूल्यावर आकारणी करताना इमारतीच्या घसारा या किमतीतून वजा करण्यात येणार आहे. त्या समितीची मार्गदर्शक तत्वेही त्यात सांगितली आहेत. इमारतीचे भांडवली मूल्य काढताना इमारतीचा क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मूल्यदर, इमारतीच्या प्रकारानुसार आकारणी, घसारा, इमारतीचा घरगुती, व्यावसायिक आणि वाणिज्य वापरासाठीचे निर्देशांक गृहीत धरण्यात येणार आहेत. यासाठी भूमिअभिलेख विभागातील रेडिरेकनरचा वापर करण्यात येणार असून यासाठी अधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकांची दमछाक होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
आता गृहकराची नवी आकारणी भांडवली मूल्यांवर
By admin | Updated: January 17, 2016 00:36 IST