भंडारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीकाठावर सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आणि आता बंद होण्याच्या स्थितीत असलेल्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी निधीची गरज आहे. या प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यासाठी किमान २.३० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. निधी मिळाला तर देखभाल दुरुस्तीची कामे सुरु होऊ शकतात.सोंड्याटोला प्रकल्पात बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी उपयोगात आणलेल्या बॅटरीसह अन्य उपकरणे जळाले आहेत. त्यामुळे ही योजना सद्यस्थितीत बंद पडलेली आहे. याशिवाय या प्रकल्पातील वीज पुरवठा बंद झाला आहे. परिणामी प्रकल्पस्थळ अंधारात आहे. सुत्रानुसार, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सिहोरा क्षेत्रातील ११ हजार हेक्टर शेतजमिनीचे सिंचन होऊ शकेल यासाठी सोंड्या या गावानजिक २००८ मध्ये ६० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बांधण्यात आला. यात बावनथडी नदीतील पाण्याचा उपसा करुन चांदपूर जलाशयात सोडणे आणि हे पाणी जलाशयाच्या नहारातून शेतापर्यंत सोडण्यात येणार होते. त्यानंतर बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करण्यात आला परंतु याठिकाणी असलेली यंत्रसामुग्री बंदस्थितीत राहिल्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा उपसा करण्यासाठी असमर्थ ठरली.उपकरणे बदलण्यासाठीही निधी नाहीबंदस्थितीत असलेले उपकरण आणि जळालेल्या बॅटऱ्या बदलणे आणि पंपगृहांच्या दुरुस्तीसाठी विभागाकडे निधी नाही. देखभालीची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंपनीला २.३० कोटींचे देयके दिले नाही. परिणामी देखभाल दुरुस्तीची कामे अपूर्ण आहेत. वास्तविक पाहता उपसा सिंचन प्रकल्पाच्या बॅटरी दर तीन वर्षांनी बदलविले गेले पाहिजे. परंतु निधीअभावी ही कामे रखडली आहेत. (शहर प्रतिनिधी)निधीअभावी आणि देखभालीअभावी बंद होणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला अलिकडेच किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी५० शेतकऱ्यांसह सोंड्याटोला प्रकल्पाला भेट दिली. अभियंता असलेले पटले यांना पाहणी दरम्यान या प्रकल्पातील बॅटरी २००८ पासून बदलविण्यात आले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. वीज पुरवठा बंद झाला आहे. विजेचे स्विच बोर्ड आणि वायरिंग अस्तव्यस्त झाली आहे. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत तात्काळ प्रभावाने सहा लाख रुपयांचा निधी मिळाला तर नवीन बॅटरी लावून प्रकल्प सुरु होऊ शकतो. प्रकल्प विभागाने यासंबंधी संशोधित प्रस्ताव दोन वर्षांपासून पाठविला असला तरी हा प्रस्ताव मंत्रालयात विचाराधीन आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकत नाही. या प्रलंबित प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. निधी न दिल्यास प्रकल्पस्थळावर शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा ईशारा राजेंद्र पटले यांनी दिला आहे.
‘सोंड्याटोला’ प्रकल्पाला २.३० कोटींची गरज
By admin | Updated: June 21, 2014 00:59 IST