भंडारा : मागच्या २५ वर्षात मिळाला नाही इतका निधी गेल्या दोन वर्षात भंडारा नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला. परंतु अंतर्गत गटबाजी आणि उदासीनतेमुळे विकासकामे ठप्प झाली असून रखडलेली कामे तातडीने करा अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेता धनंजय दलाल यांनी पदाधिकार्यांना दिला आहे. भंडारा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून मागच्या अनेक वर्षात मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी पट अधिक निधी प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने मागील दोन वर्षात नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला. पालिका पदाधिकार्यांची उदासीनता आणि अंतर्गत गटबाजी यामुळे निधीचा निवियोग होत नसून, विकासकामे ठप्प पडल्याचे दलाल यांनी म्हटले आहे. अनेक कामांचे वर्क ऑर्डर जारी करूनही कामे सुरु करण्यात आली नाहीत. हे वर्क ऑर्डर रद्द करून नवे आदेश देण्यात यावे, नळांना दोन वेळ पिण्याचे मुबलक पाणी पुरवावे, शहरातील स्वच्छता आणि विद्युत व्यवस्था याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, पावसाळ्याच्या आधीची कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना दलाल यांनी केल्या आहेत. शहरातील विकासाच्या कामांकडे लक्ष पुरवा अन्यथा पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल असे स्पष्ट करीत या पदाधिकार्यांना एक प्रकारे घरी बसविण्याचाच इशारा दलाल यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आवळला पालिकेविरुद्ध रोष
By admin | Updated: May 25, 2014 23:22 IST