खेळ उन सावल्यांचा : धानपिकांना संजीवनीभंडारा : तब्बल २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर वरुण राजाने मागील आठवड्यात हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा सप्ताहभर विश्रांती घेत आज बुधवारी दमदार हजेरी लावली. भंडारा शहरात सकाळी ९ वाजताच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र १२ वाजतानंतर चांगलीच उन तापल्याने भंडारेकरांना उकाडा अनुभवला.आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ९ वाजतापासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने उग्ररुप धारण केले. जवळपास २० मिनिटांपर्यंत मुसळधार पाऊस बरसला. बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रहदारी वाढली होती. मात्र पावसामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले. मोठा बाजार परिसरात ग्रामीण क्षेत्रातील आलेल्या भाजीविक्रेत्यांची दमछाक झाली. १०.४५ च्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर दुपारी सूर्यदेवाने दर्शन दिले. सायंकाळी ५ वाजतापर्यंत उन तापल्याने उकाडा जाणवला. सकाळी पाऊस तर दुपारी उन. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवला. आधीच विषमज्वर या आजाराने जिल्ह्यात पाय रोवले असून दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. दुसरीकडे या पावसामुळे धानपिकांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे. भंडारा तालुक्यात काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ८ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली. भंडारा शहरात अर्ध्या तासाच्या कालांतरात २० ते २५ मि.ली. पाऊस बरसल्याची प्राथमिक माहिती आहे. (प्रतिनिधी)
सकाळी मुसळधार, दुपारी उन्ह
By admin | Updated: September 22, 2016 00:34 IST