जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील येत असलेल्या ११ सोसायट्या, ३१ गांवे व २ बँकेचा कारभार एका गटसचिव साभांळत असल्याचे दिसून येत आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांना खरीब, रबी पिकाच्या लागवडीकरिता व इतर कामाकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेतून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या समितीच्या शिफारशीने शेतकर्यांना कर्ज वाटप करीत असतो. या सर्वांचा लेखा जोखा त्या सोसायटीच्या गटसचिव सांभाळत असतो. तालुक्यात येत असलेल्या शिवणी, आंधळगाव, वडेगाव, पालडोंगरी, सकरला, जांब, धोप, कांद्री, हिवरा, सालई, ताळगाव अशा ११ सोसायटीमध्ये शिवणी, अकोलाटोला, टोला, आंधळगाव, मलिदा, वडेगाव, पालडोंगरी, सकरला, खैरलांजी, जांब, देऊळगाव, बेटेखारी, धोप, कांद्री, बोंद्री, नवेगाव, धुसाळा, घोरपड, वाडा, फुटाळा, पांजरा, हिवरा, वासेरा, सालई, सिहरी, नागठाणा, ताळगांव अशा ३१ गावांचा समावेश आहे. ३१ गावातील शेतकर्यांना कर्ज देणे वसुली घेणे व इतर कामे या संस्थेच्या गटसचिवाला करावी लागतात. या ३१ गावांचा कारभार गटसचिव ए. एस. गायकवाड हे सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी ११ सोसायट्यांमध्ये सहा गटसचिव काम सांभाळत होते. परंतु पाच गट सचिव सेवानवृत्त झाल्याने ११ सोसायटीचा भार एकट्या गटसचिवावर आल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मानसिक त्रास उद्भवत आहे. तसेच ३१ गावाकरिता एकच निरीक्षकसुध्दा आहे. एवढे असूनसुध्दा गटसचिव आपल्या कामामध्ये कोणतीही कमतरता भासू देत नाही. तरीसुध्दा सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्यांनी व पदाधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन गटसचिव जागेच्या रिक्त अनुशेष त्वरित भरण्याची गरज निर्माण झालेली आहे. (वार्ताहर)
३१ गावांचा कारभार एका गटसचिवाच्या खांद्यावर
By admin | Updated: May 19, 2014 23:14 IST