श्वेता येळणे : गुणवंत खेळाडूंचा सत्कार
: वरठी : आयुष्यात माणसाला अनेक प्रकारच्या व्यक्तींचा सहवास लाभतो. आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या चरित्राचा प्रभाव आपल्यावर पडतो. विचारांचा पगडा हा संपर्कातील एक भाग असतो. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणप्रमाणे समाज एक शाळा आहे. समाजातील प्रत्येक घटकांपासून आपल्याला अनेक बाबी शिकायला मिळतात. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवातून माणूस शिकतो, असे प्रतिपादन सरपंच श्वेता येळणे यांनी केले. प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय येथे गुणवंत खेळाडूचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राम विकास अधिकारी दिगंबर गभने व प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संगीता सुखाणी, माजी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, पवन रामटेके, योगेश हटवार, पोलीस पाटील लता सपाटे, नितीन काकडे, सुधीर बागडे, शारदा सिंग व संगीता बदवाईक, मनीषा मडामे व मंजू रामटेके उपस्थित होते. यावेळी वरठी येथील क्रीडा जगतातील खेळाडूंना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यात सचिन झळके, विक्की भिवंगडे, गोपाळ माटे, निर्मल मदान यांचा समावेश होता. ओम शांती केंद्राच्या प्रमुख उषादीदी यांनी यावेळी उपस्थित खेळाडू व नागरिकांना मार्गदर्शन केले. जीवनात खेळ व शालेय शिक्षण याचे महत्त्व विशद करताना मानसिक शांतीकरिता आध्यात्मिक शिक्षण व संतांचा सहवास आवश्यक असल्याचे सांगितले. संचालन व आभार संगीतादीदी यांनी मानले.