लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले. जिल्ह्याला कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. आता दुसऱ्या लाटेत जाणवलेल्या उणिवा दूर करून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा, अशी सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, नितीन सदगीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, तहसीलदार अक्षय पोयाम, साहेबराव राठोड उपस्थित होते.सामान्य रुग्णालयातील प्राणवायू प्रकल्प, पेडियाट्रिक वार्ड, कोविड वार्ड, आयसीयू वार्ड, आरटीपीसीआर चाचणी केंद्र आदी ठिकाणी भेट देऊन त्यांनी तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली होती. वरठी येथील सनफ्लॅग कंपनी मधील ऑक्सिजन प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे तिसऱ्या संभाव्य लाटेची पूर्वतयारी म्हणून सनफ्लॅग कंपनी जवळ ५०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणी करून त्यांनी तात्काळ रुग्णालया सुरू करण्याची सूचना केली.
कोरोनामुक्त गाव करण्यावर भर द्या- कोरोनामुक्त गाव करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून लवंगारे म्हणाल्या की, कोरोनामुक्त गावात शाळा सुरू होतील असे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करणे आवश्यक असून सर्व खबरदारी घेऊन याबाबत पावले उचलावीत. क्रियाशील रुग्ण नाहीत तसेच शून्य रुग्ण असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.