नरेंद भोंडेकर यांच्या हस्ते पंप सुरू : २४ तासाच्या आत पाटबंधारे विभागाला आली जाग
भंडारा : अपुऱ्या पावसामुळे धानपीक धोक्यात आले असल्याने ४८ तासात पाणी न सोडल्यास स्वतः पंप सुरू करण्याचा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला होता. मात्र पाटबंधारे विभागाला २४ तासातच जाग आली. आमदार भोंडेकर यांच्या हस्ते करचखेडा, टेकेपार व नेरला उपसा सिंचन योजनेचे पंप सुरू करून पाणी सोडण्यात आले.
भोंडेकर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला असून, अनेक शेतकऱ्यांनी आभार मानले. यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात चांगली झाली, मात्र त्यानंतर मागील १५ दिवसांपासून तुरळक पाऊस होता. धान पिकाची अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झाला. आधीच कोरोनामुळे सर्वस्व गमावलेला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. हातात असलेले पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी टोकाची भूमिका घेतली होती. उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडतेवेळी उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल गायधने, पवनी तालुकाप्रमुख विजय काटेखाये, आशिष चवडे, रामू बेदरकार, राजू मोटघरे, आशिष माटे, राजू ब्राह्मणकर, प्रशांत भुते, जितेश लिचडे, समीर कुर्झेकर, प्रकाश मानपुरे, उमेश पंचभाई, राहुल बागडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.