पहेला : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नासी, एटेवाही, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागते व तेथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, बोरगाव खुर्द, रावणवाडी, वाकेश्वर, पहेला इत्यादी गावांना पुरविण्यात येत होते. परंतु आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरु झाल्याने रावणवाडी जलाशयाची जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडलेले असल्याने आता रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, रावणवाडी आणि वाकेश्वर या तीनच गावांना मिळत आहे व बरेचशे पाणी तलावात शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले पाणी जवळच्या सोनेगाव, गोलेवाडी, पन्नासी, डोंगरगाव, पागोरा, ऐटेवाही, भिकारमिन्सी इत्यादी गावांना मिळू शकते. त्याकरिता रावणवाडी जलाशयापासून ते सोनेगाव, एटेवाही, गोलेवाडी, डोंगरगाव ते पागोरा पर्यंत नवीन नहर काढल्यास त्या सात गावातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय होऊ शकते आणि जर कमी गेल्यास टेकेपार उपसा सिंचनचे पाणी रावणवाडी जलाशयात पाडून ते पाणी त्या सात गावातील शेतकऱ्यांना देता येईल. मात्र या नवीन प्रस्तावाकडे या क्षेत्राचे आमदार अधिकारी यांनी दूरदृष्टी ठेवून बघितले तर नक्कीच हे काम तेवढे कठीण नाही. म्हणून या सातही गावातील नागरिक शासनाच्या प्रती आपला रोष व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
सिंचनाअभावी शेती धोक्यात
By admin | Updated: July 14, 2014 23:48 IST