तुमसर : गंतव्य स्थानावर जाण्याकरिता सुरक्षित मार्गाची निवड सामान्य नागरिक करतात. मागील तीन वर्षात या तालुक्यातील ४९ मोटारसायकल स्वारांना आपल्या प्राणास मुकावे लागले हे धक्कादायक तितकीच वास्तव स्थिती समोर आली आहे. येथे रस्ते आहेत की ते मृत्यू मार्गावरील द्वार आहे, असे म्हणते वावगे ठरणार नाही. मात्र या सर्व प्रकाराला रस्त्यवरील खड्डे कारणीभूत आहेत. या अपघातात बहुतांश दुचाकी स्वार मृत्यूमुखी पडले आहेत.तुमसर तालुक्यातील विविध रस्त्यावर सन २०१३ मध्ये एकूण २६, सन २०१४ मध्ये १८ व फेब्रुवारी २०१५ मध्ये ३ व मार्च महिन्यात दोघांचा अपघातात मृत्यू झाला. यासर्व अपघातांची माहिती प्राप्त केली असता त्यांच्या डोक्याला व छातीला मुका मार लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या मृतांमध्ये शहरी व ग्रामीण भागातील युवकांची संख्या असून त्यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. काही अपघातात मद्य प्राशन हे एक मुळ कारण आहे. काही अति भरधाव वेगाने गाडी चालविणे तर काही ठिकाणी जनावरे आडवे आल्याने अपघात घडला आहे. बहुतेक कुटूंबातील कर्ते पुरूष या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. काही कुटूंबातील एकुलता मुलगा मृत्यूमुखी पडला आहे. गंभीर जखमी व किरकोळ जखमींची संख्या २०० च्या वर आहे. डोक्याला इजा होवू नये याकरिता अपघातग्रस्तांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला असता तर हा आकडा ५ ते ७ वर इतका खाली घसरला असता, असे पोलीस तथा डॉक्टरांचे म्हणने आहे.अपघातात सतत वाढ होणे याचा गृहमंत्रालय सध्या गांभीर्याने अभ्यास करीत असून पुढील काळात हेलमेट सक्तीने करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
रस्त्यावरील खड्डे देताहेत मृत्युला आमंत्रण
By admin | Updated: April 2, 2015 00:53 IST