चरणदास बावणे।लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : ‘राशन तर मिळाले भाऊ, याले आता कायच्यासोबत खाऊ’ असा सवाल स्वस्त धान्य दुकानातून धान्य घरी घेऊन जाणारा पवनी तालुक्यातील कोंढा-कोसरा येथील एक कार्डधारक करीत होता. लॉकडाऊनने सर्व कामे ठप्प झाली आहेत. हातात पैसा नाही, शासनाने धान्य दिले परंतु मीठ, मिरची, तेल आणायचे कसे असा प्रश्न ग्रामीण भागातील गोरगरिबांपुढे पडला आहे.केंद्र व राज्य शासनाने राशन कार्डधारकांना लॉकडाऊनच्या काळात तांदूळ, गहू वितरण सुरु केले आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची एकप्रकारे सोय झाली. परंतु आता या धान्यासोबत त्यांच्यापुढे नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. गत तीन आठवड्यापासून सर्व व्यवहार ठप्प आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकडे एकही छदामही राहिला नाही. त्यामुळे तांदूळ गहू मिळाले पंरतु ते कशासोबत खायचे असा प्रश्न आहे. कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्यांचे जीवन संकटात आले आहे. अनेकांसमोर कठीण समस्या निर्माण झाली आहे. दोनवेळ चुल पेटणेही कठीण झाले आहे. शासनाने धान्यासोबत तिखट, हळद, मीठ, दिले असते तर चांगले झाले असते, असे मजूर म्हणत आहे.सध्या सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन आहे. आधी हा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार असे सांगण्यात आले होते. पंरतु लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत वाढला आहे. त्यामुळे असंघटीत कामगार, मजूर, भटक्या समाजाचे हाल होत आहे. अनेक मजूर महानगरातून गावात पोहोचले आहे. त्यांना गावात कोणते काम करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातीलच मजुरांना काम नाही, तर बाहेरुन आलेल्यांना काम कसे मिळणार. पैसाच नाही तर चिलापिल्यांना जगवायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.एकंदरीतच या लॉकडाऊनने गोरगरीबांपुढे दोन वेळच्या भोजनाचा प्रश्न निर्माण केला आहे. शासन धान्य देत असले तरी त्यासोबत लागणाºया इतर साहित्यांचे काय? असा यक्ष प्रश्न सर्वांपुढे आहे.
राशन तर मिळाले भाऊ, याले आता कायच्यासोबत खाऊ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST