प्रफुल्लभार्इंचा सवाल : लोकांवर नाराज नाही, परंतु त्यांनी आत्मचिंतन करावेभंडारा :भंडारा-गोंदिया या आपल्या मतदार संघासाठी काय केले नाही? सिंचनापासून तर उद्योग, रोजगारवाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जिल्ह्यांना राज्यात आणि देशात वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु विकासाच्या या वाटेवर लोकांनी आपली साथ अर्ध्यातच सोडली. मला या निवडणुकीत हारण्याचे दु:ख नाही, मात्र एका लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे म्हणजे लोकांची अपेक्षापूर्ती होईल, असा प्रश्न पडला आहे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्याच्या धक्क्यातून सावरल्यानंतर आणि राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर खा.पटेल यांनी शनिवारी पहिल्यांदाच भंडारा येथे आले. स्थानिक जे.एम.पटेल महाविद्यालयात पत्रकारांशी मनमोकळी चर्चा केली. आपल्या पराभवासाठी कोणत्याही कार्यकर्त्याला दोष देणार नाही. आपल्या कार्यप्रणालीतही काही दोष होता, असे वाटत नाही. इतकी वर्षे राजकारण करीत असताना या जिल्ह्यातील लोक मला आणि माझ्या कार्यपद्धतीला ओळखत नाही, असे होऊ शकत नाही. संपूर्ण देशभरात माझ्यासारखे आपल्या मतदार संघासाठी तळमळीने काम करणारे मोजके खासदार होते. मी कधीही जात, पात, धर्माचे राजकारण केले नाही. पण लोकांनी जर विकासाऐवजी अन्य गोष्टींना महत्व दिले असेल तर माझा काय दोष? असेही त्यांनी स्पष्ट केले. तुमच्या प्रयत्नाने जिल्ह्यात आलेले अनेक प्रकल्प आता पूर्ण होतील का? त्यासाठी तुम्ही मदत करणार का? या प्रश्नावर खा.पटेल म्हणाले, खरे तर आता याची पहिली जबाबदारी नवीन लोकप्रतिनिधीची आहे. आता त्यांचे सरकार आहे. तरीही त्यांना जिल्ह्यातील कोणत्याही विकासात्मक कामांसाठी माझी गरज वाटत असेल आणि ते काम माझ्यामुळे मार्गी लागेल, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी जरूर माझ्याकडे यावे, मी निश्चितच त्यासाठी मदत करीन, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आपल्या वडिलांनी (मनोहरभाई पटेल) १९४६ पासून राजकारणाला सुरूवात केली. मीसुद्धा २४ वर्षांपासून या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना अनेकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. केवळ मंत्रीपद किंवा खासदारकी मिळाल्याने कामे होत नाही. त्यासाठी सर्व स्तरावर असलेले संबंध कामी येतात. आपण याठिकाणी जे काही करू शकलो, त्यासाठी या संबंधांचा योग्य उपयोग केल्यानेच ते शक्य झाले. यावेळी आ.अनिल बावनकर, आ.राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, अविनाश ब्राम्हणकर, सच्चिदानंद फुलेकर व राकाँचे पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे?
By admin | Updated: June 14, 2014 23:21 IST