पवनी वनपरिक्षेत्रातील प्रकार : वाघ, बिबट्यांनी केले पाळीव जनावरांना फस्तप्रशांत देसाई भंडारानिर्मनुष्य जंगलातून चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पायदळ मार्गक्रमण करीत शाळेत शिकायला जात आहेत. मात्र, हिंस्त्र श्वापदांचा धोका असल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विचार करून जंगलव्याप्त परिसरातील शाळा दुपारी ४ वाजताच बंद करण्यात येत असल्याचे वास्तव पवनी वनपरिक्षेत्रातील काही गावात असल्याचे समोर आले आहे.पवनी तालुक्यातील व नागपूर जिल्ह्यातील काही भाग मिळून उमरेड-कऱ्हांडला हे अभयारण्य अस्तित्वात आले आहे. सोबतच पवनी वनपरिक्षेत्रातील काही भाग राखीव वनक्षेत्रात मोडतो. पवनी, भुयार, कन्हाळगाव व मांडवगोटा हा परिसर पवनी वनपरिक्षेत्रात येतो. या क्षेत्रांतर्गत ढोरप, शिवनाळा, कन्हाळगाव, नांदीखेळा, खातखेळा, गुडेगाव, शेळी (सोमनाळा), विलम, सावरला या गावांचा अंतर्भाव आहे. सध्या ‘जय’ नामक वाघाची परिसरातील गावात दहशत पसरली असून शेतीवर जाणारे मजूर, शेतकरी, पालक व विद्यार्थी भयभीत आहेत. ढोरप, शिवनाळा, खातखेळा, विलम, नांदीखेळा, शेळी (सोमनाळा) येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत, कन्हाळगांव, गुडेगाव येथे पहिली ते सातवी तर सावरला येथे पदवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. ढोरप, शिवनाळा, खातखेळा, विलम, नांदीखेळा, शेळी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जंगलातून मार्गक्रमण करून बाहेरगावी जावे लागते. मागीलवर्षी बिबट्याने उच्छाद मांडला होता. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. मात्र, या बिबट्याने वनकर्मचाऱ्यांना आठवडाभर हुलकावणी दिली होती. यावर्षी ‘जय’ नामक वाघाची भीती पसरली आहे. पंधरवड्यात वाघाने परिसरातील ग्रामस्थांची पाळीव जनावरे फस्त केली आहे. आठ दिवसापासून ‘जय’मुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतावर जायचे असल्यास या परिसरातील शेतकरी जमावाने जातात. या परिसरात हिंस्त्र श्वापदांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जीवाच्या भितीने परिसरतील शाळांना दुपारी चार वाजताच सुटी देण्यात येत आहे. हिवाळ्यात दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडतो. त्यामुळे येत्या काही दिवसात सायंकाळच्या सुमारास जंगलातून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून ठराव घेऊन शाळा दुपारलाच बंद करण्याबाबत शिक्षण विभागाला कळविणार आहेत.जीव मुठीत घेऊन त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची साधन उपलब्ध नाही. या मार्गावर खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रवासी मिळत नाही. त्यामुळे ही वाहनधारक या मार्गावर केवळ पवनी येथील आठवडी बाजाराच्या दिवशीच वाहने चालवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन सायकल किंवा पायदळ जंगलातून शाळेत जावे लागते. शेळी येथील विद्यार्थी सावरला येथे दररोज १४ किलोमीटर तर ढोरप, कन्हाळगांवचे विद्यार्थी पवनी येथे दररोज ३४ किलोमीटरचा प्रवास करतात. जंगलव्याप्त परिसरातील गावातील शाळा आहेत. या शाळांना संरक्षण भिंत नाही. त्यासोबत वीज पुरवठा व अन्य भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे शाळांमधील मुलांचा जीव टांगणीला असतो. सध्या हिंस्त्रप्राण्यांचा उच्छाद असल्याने शाळा लवकर बंद करावी लागते. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. - महेश गावंडेमुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, ढोरप.
हिंस्र श्वापदांच्या भीतीने ४ वाजताच शाळांना सुटी
By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST