पालिकेचे दुर्लक्ष : प्राचीन वारसा जपणाऱ्या पवनीकडे प्रशासन लक्ष देईल का?अशोक पारधी पवनीऐतिहासिक नगर नोंद असलेल्या पवनी नगरात परकोट (किल्ला), वैनगंगा नदीवरील घाट, शेकडो मंदिर, बौध्द स्तुपाचे अवशेष व सुस्थितीत असलेले गरुडखांब, गोसेखुर्द धरण, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, सिंदपुरी महासमाधीभूमी पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पंरतू लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पवनी येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित ठरत आहे. सुमारे ३५० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या घाटांपैकी प्रसिध्द असलेला दिवाणघाट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.पवनी नगराच्या उत्तरेला वैनगंगा नदी तिरावर दिवाणघाट, पानखिडकी, ताराबाईचा घाट, वैजेश्वरघाट साडेतीनशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला आहे. चौकोनी आकाराचे दगड व चुना वापरून मजबूत बांधकाम आहे. पंरतु आतापर्यंत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे या घाटांची दुरावस्था झालेली आहे. लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन व आतापर्यंत नगरसेवकांनी वैजेश्वर घाटाचे महत्व लक्षात घेवून पर्यटत विकास निधीचा उपयोग घाटांच्या परिसर विकासासाठी केलेला आहे.पंरतु पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असलेले व भंडारा मार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिवाणघाटाच्या डागडुजीकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही.दिवाणघाट हे दोन घाटांचा समुह म्हणून बांधलेला आहे. त्यापैकी एक घाट पूर्णत: खचलेला आहे. दुसरा घाट व बाजुचे बुरुज ढासळण्याच्या मार्गावर आहे. मकरसंक्रात, कार्तिक व हरीतालिका व गणेशोत्सव अशा सणांच्या वेळी भाविक मोठ्या संख्येने दिवाणघाटावर येतात. या दिवाणघाटाची दुरावस्था बघून भाविक प्रशासनाविषयी रोष व्यक्त करतात. पवनी शहरातील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि दिवाबत्ती यावर पालिका प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधी रूपये खर्च करणाऱ्या नगर पालिका प्रशासनाने पवनीच्या पर्यटनवाढीसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. दिवाणघाट नामशेष होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती व्हावी, अशी पवनीकरांची माफक अपेक्षा आहे.
ऐतिहासिक दिवानघाट दुर्लक्षित
By admin | Updated: January 15, 2016 01:19 IST