खरिपाचा नियोजन आढावा : पालकमंत्र्यांचे निर्देश तुमसर : शेतकर्यांचा खरीप हंगाम हा बहुतांश पीक कर्जावर अवलंबून असतो. शेतकर्यांची अडवणूक होवू नये म्हणून शेतकर्यांना शेतीसाठी पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित कांबळे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार अनिल बावनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते. खरीप हंगाम शेतकर्यांसाठी महत्वाचा आहे, असा उल्लेख करून पालकमंत्री म्हणाले, गतवर्षी अतवृष्टी आणि गारपीट व अन्य नैसर्गीक परिस्थितीमुळे शेतकर्यांचे मोठे मोठे नुकसान झाले. यावर्षी शेतकर्यांना या हंगामात चांगला लाभ व्हावा यादृष्टीने कृषी विभागासह इतर विभागांनी योग्य समन्वय ठेवून शेतकर्यांना मदत व मार्गदर्शन करण्याचे धोरण राबवावे. बोगस बियाण्यांच्या माध्यमातून त्यांची फसवणूक होणार नाही. यासाठी बियाण्यांच्या चाचण्या घ्याव्यात. पेरणीनंतर बियाणे उगवलेच नाही तर अशा कंपन्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शेतकर्यांना कृषी केंद्रामार्फत दर्जाहिन औषधीची विक्री होत असल्याचे निर्दशनास येते. याबाबत संबंधित कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, असे चर्चेदरम्यान खा.नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, शेतकर्यांची धान खरेदी सर्मथन मुल्यानुसार ३0 जूनपर्यंत करण्यात यावी. जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी जरी उपलब्ध असल्या तरी योग्य प्रकारे सिंचन होण्यासाठी तलावातील गाळ काढणे, कालवे व पाटचर्यांची दुरूस्ती करण्यास प्राधान्य दिले जावे तसेच शेतकर्यांना सरळ व सोप्या पद्धतीने पीक कर्ज देण्याची कार्यवाही केली जावी, असेही खा.पटोले यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा सादर केला. बैठकीला सहकार बँका, विज वितरण कंपनी, सिंचन, मार्केटिंग व अन्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शेतकर्यांना पीककर्ज वेळेत द्या
By admin | Updated: May 27, 2014 23:28 IST