कोंढा-कोसरा : किशोरवयीन मुलगी ही उदयाची माता आहे. म्हणूनच लहानपणापासूनच चांगल्या सवयी, चांगले आरोग्य ठेवणे हे तिचे कर्तव्य आहे. खेड्यात अनेक घरी शौचालय असून सुध्दा शौचालयाचा वापर केला जात नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडते. तेव्हा ग्रामीण भागातील मुलींनी शौचालयाचा वापर करावा, असे प्रतिपादन आदर्श शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ज्ञानेश्वरी खोब्रागडे यांनी व्यक्त केले.आरोग्य पंधरवडा अभियानाचे औचित्य साधून आरोग्य विभाग व संत तुकाराम हायस्कूल ब्रह्मी येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र आसगाव (चौ.) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता शेट्टीवार यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश खोब्रागडे, दादा धोटे, सुनीता धावळे, आशा पर्यवेक्षिका रेखा तिघरे, आरोग्य सेविका ललिता लोणारे, दीपा रामटेके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयातील ८ ते १० वर्गाच्या विद्यार्थिनी, आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका व गावातील महिला यांच्यासाठी विद्यालयात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. डॉ. अनिता शेट्टीवार यांनी मुलीना वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलाविषयी माहिती दिली. सामाजिक स्वास्थ्य योग्य राखण्यासाठी प्रत्येक घरी शौचालय बांधणे आवश्यक आहे. प्रास्ताविक आशा सेविका लक्ष्मी घावळे संचालन मीना तिपात्रे तर आभार कांता घावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मुलींनी शौचालयाचा वापर करावा - खोब्रागडे
By admin | Updated: March 28, 2015 00:38 IST