भंडारा, तुमसर येथील प्रकार : पालिकेचे दुर्लक्ष, जीव धोक्यात घालून रहिवासी करतात घरात प्रवेशतुमसर : तुमसरातील विनोबा भावे नगरातील पॉश कॉलोनीचे सध्या बेटात रुपांतर झाले आहे. येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून घरात प्रवेश करावा लागत आहे. विकासाच्या बाता करणाऱ्यांचे येथे पितळ उघडे पडले आहे. या प्रभागाच्या नगरसेवकांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. दोषपूर्ण नाली बांधकामामुळे हा फटका बसत आहे.तुमसर-भंडारा मार्गावर शकुंतला सभागृहाच्या मागे पॉश कॉलोनीत रस्त्यावरुनच नाल्यासारखे पाणी पावसाळ््यात वाहते. रिकाम्या भूखंडातूनपुढे तो शहराबोहर जातो. पावसाचे पाणी व शहरातील गल्याबोळीतील पाणी या वस्तीत शिरतो. एका रिकाम्या खोलगट भूखंडात तीन ते चार फूट पाणी साचले आहे. जीव धोक्यात घालून नागरिकांना येथे घरात प्रवेश करावा लागत आहे. प्रा. व्ही.जी. भगत व त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या घराच्या छतावरुन घरात येते. नगरपरिषदेने सांडपाणी वाहून जाण्याकरिता दोषपूर्ण नाली बांधकाम केल्याचा फटका येथे बसत आहे. ही नाली अगदी लहान आहे. नाली उंच असून नालीकडे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रिकाम्या भूखंडाची नोंद नगरपरिषदेकडे करण्याचा आदेश नगरपालिका प्रशासनाने केली आहे, अंतर्गत रस्त्यावरुन दोन ते तीन फूट पाणी वाहने व साचत असल्याने नियोजनाच निश्चितच चूक झाली आहे. विकासाच्या ध्यास घेणाऱ्यानी ही मुलभूत समस्या दूर करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)तकिया वॉर्डातील घरात शिरले पावसाचे पाणीभंडारा : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तकिया वॉर्डातील साई मंदीरच्या मागील परिसरात एका खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणात सांडपाणी व नैसर्गिक पाणी जमा होते. यामुळे वसाहतीतील नागरिकांना पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागतो. नगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये येणारा साई मंदिरामागे व ओम हॉस्पिटल असलेल्या परिसरातील तकिया वॉर्डात नवीन वसाहत आहे. येथे सुमारे २५ कुटुंब वास्तव्याला आहे. सुमारे दोन हजारपासून ही वसाहत अस्तित्वात आली आहे. या वसाहतीला लागून एका व्यक्तिचा रिकामा भूखंड आहे. या भूखंडात पावसाळ्यात पाणी साचते. पाणी जाण्याचा मार्ग नसल्याने ते सरळ या वसाहतीत येते. सदर वसाहतीतील काही भागात सिमेंट रस्ते व सांडपाण्याची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, वसाहतीच्या परिसरातील मोकळ्या भूखंडावर साचत असलेले पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी पालिकाकडे केली. त्यांच्याकडून थातुरमातूर उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात असलेल्या रिकाम्या भूखंडात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ते सर्व पाणी या वसाहतीतील रस्त्यावरून काहींच्या घरात जात आहे. यासोबतच या पाण्याच्या माध्यमातून साप, विंचू व अन्य किटकांचा धोका येथील रहिवाशांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सदर गंभीर बाबीचा विचार करून पालिका प्रशासनाने नागरिकांना आरोग्यसुविधा देण्याच्या उद्देशाने सांडपाणी व साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)
वसाहतीला आले ‘बेटा’चे रूप
By admin | Updated: August 15, 2015 01:04 IST