भंडारा : पूरपीडित व प्रकल्पग्रस्तांना मोबदला देऊन पुनर्वसन करा, अतिक्रमणधारकांना नियमानुकूल करा, जबरान जोतदारांना वनहक्क कायद्यांतर्गत मालकी पट्टे द्या व भंडारा शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित सोडवा, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात सोमवारी कचेरीसमोर धरणे व निदर्शने करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
चर्चा करताना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ग्रामसेवक कॉलनी (भंडारा) येथील ऐच्छिक पुनर्वसनाच्या प्रस्तावाचा त्वरित पाठपुरावा करण्यात येईल, खमारी बुटी येथील पूरपीडितांना ९५ हजारांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अतिक्रमणधारकांची घरे नियमानुकूल करण्यासाठी व पुरामुळे पडलेल्या घरांची यादी पाठविण्यात यावी तसेच भंडारा शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित सोडविण्यासाठी जबाबदारी ठरविण्याचे व इतर प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, शेतमजूर युनियनचे सचिव रत्नाकर मारवाडे, गणेश चिचामे, महादेव आंबाघरे, विजय वैद्य, राकेश बल्लमवार, विनोद चित्रिव, प्रियकला मेश्राम व विलास केजरकर यांचा समावेश होता. सदानंद इलमे, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, मनोज भजे ,दुर्गेश वाडीभस्मे, दिनेश पवार, श्रीकांत पांडे, खुशाल साठवणे यांचे सहकार्य लाभले.