अड्याळ येथील प्रकार : नाल्या व घाण कचऱ्याने ग्रामस्थ त्रस्त, आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताअड्याळ : मान्सूनपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांची व घाण कचऱ्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. अड्याळ ग्रामपंचायतीने नाल्यांची साफसफाई कागदोपत्री केल्याने पहिल्याच पावसाने ग्रामपंचायतीचे पितळ उघडे पडले. पावसाळ्यापूर्वी नालीची साफसफाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. येथील ग्रामपंचायत प्रशासनाने नालीची साफसफाई केली नाही. त्यामुळे पहिल्या पावसातच ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार उघडकीस आला. नाल्या अगोदरच कचऱ्याने तुंबल्या असल्याने पहिल्या पावसामुळे नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहू लागले. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन नियमावर बोट ठेवून कराची वसुली करते.मात्र, गावातील सोई सुविधांकडे त्यांनी पुरते दुर्लक्ष केले आहे. पावसाळा सुरु होऊनही नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून गावातील पथदिव्यांची समस्याही जैसे थे आहे. याकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायत प्रशासनाला मुळीच स्वारस्य नाही. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अड्याळ येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गावातील नाल्या घाणीने साचून असल्याने पावसाळ्याचे पाणी गटारातून वाहनू जाण्याऐवजी ते रस्त्यांवर वाहू लागले. ते घाण पाणी अनेकांच्या घरात घुसले. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. नाल्या तुंबून असल्याने अनेक वॉर्डातील घरासमोर डबक्यांची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सदर पाणी वाहून जावे यासाठी नागरिकांनीच नाल्यांची साफसफाई तथा गटारातील पाणी सरळ जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीरतेने घेऊन नाल्यांची साफसफाई करावी व नागरिकांना सुदृढ आरोग्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
पहिल्याच पावसात पितळ उघडे
By admin | Updated: June 25, 2015 00:31 IST