पालकमंत्र्यांचे आवाहन : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकभंडारा : शाश्वत शेती हे येणाऱ्या काळात मिशन असावे. शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी या धोरणाचा पुरस्कार करीत आगामी खरीपाचे नियोजन करताना धानाची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केल्या.जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, कृषी सभापती नरेश डहारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर, उपसंचालक माधुरी सोनोने उपस्थित होते.यावेळी डॉ.सावंत म्हणाले, शासनाच्या सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांसाठी सिंचन, वीज पंपाची उपलब्धता, आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर देण्यात यावा, खरीपाचे नियोजन करताना बि बियाणे, रासायनिक खते, कर्जाचे पुनर्गठण, कर्ज परतफेड, किसान क्रेडीड कार्ड, प्रधानमंत्री पिक विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांना प्राधान्य देण्यात यावे, असे सांगितले.प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देताना मंडळस्तराचा निकष लावण्यात येतो. या निकषावर आधारित लाभ देताना गरजू व खरे लाभार्थी वंचित राहतात अशी बाब जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर पालकमंत्री म्हणाले, हे निकष बदलण्यासाठी व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. कृषी विभागाने राष्ट्रीय मृद व आरोग्य अभियानांतर्गत १०० टक्के मृद तपासणी करावी. ही तपासणी वेळोवेळी करणे व त्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.खरीप हंगाम २०१७-१८ साठी जिल्ह्याला विविध पिकांसाठी ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामाकरिता १ लाख ३ हजार ९०० मेट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन असून ३१ मार्च अखेर २७ हजार ५७९ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या निविष्ठा वाजवी दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर ७ अशा भरारी पथक गठीत करण्यात आले आहे.रासायनिक खत विक्री करता थेट लाभ हस्तांतरण या योजनेचा वापर करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी आधार कार्डचा वापर करणे आवश्यक आहे. खरेदीचे व्यवहार नगदी न करता कॅशलेस पद्धतीने करण्यावर भर देण् यात येणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके तक्रार निवारण कक्ष आहे. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या मोहिमेनुसार २०१७-१८ चे नियोजन करण्यात आले. पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण, प्रसार प्रसिद्धी, शेतकरी प्रशिक्षण, मृद आरोग्य व सेंद्रीय शेती, कांदा चाळ, नियंत्रित शेती आणि सुक्ष्म सिंचन या बाबीचा यात समावेश आहे. यावेळी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उपसंचालक माधुरी सोनवाने यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
By admin | Updated: April 27, 2017 00:29 IST