पालांदूर : खरिपाची लगबग सुरु झाली असून कृषी केंद्रात बियाण्यांची रेलचेल वाढली आहे. अशावेळी साध्या भोळ्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये याकरिता कृषी कर्मचाऱ्यांनी व स्वत: शेतकऱ्यांनी जागरूक राहावे, असे पालांदूर येथील कृषी अधिकारी अरुण रामटेके यांनी मार्गदर्शन केले.हल्ली व्यापारात स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकण्याकरिता व्यापारी गुणवत्तेचा विचार टाळून नफेखोरीकडे झुकले आहेत. मान्यताप्राप्त कंपन्यांचे बियाणे न ठेवता बोगस कंपन्यांचे बियाणे विक्रीला ठेवली जातात. कमी लागतमध्ये अधिक नफा कमविण्याकरिता बोगस पॅकिंग करून अव्वाच्या सव्वा रक्कम किंमत लावून शेतकऱ्याला लुबाडले जाते. ही फसवणूक टाळण्याकरिता प्रत्येकांनी सजग राहण्याचे आव्हान अरुण रामटेके यांनी केले आहे.बियाणे खरेदी करतेवेळी मोजमाप करू शकता. पिशवीचे वजन तपासूनच घ्यावे. पिशवीला गुणवत्तापूर्ण अधिकारप्राप्त कंपनीचे लेबल लावले असणे महत्त्वाचे आहे. कृषी केंद्र धारकाजवळून खरेदीचे बिल घेणे, बियाण्यांची पिशवी खाली, रिकामी झाल्यानंतरही जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच घरचे बियाणे वापरताना बीज प्रक्रिया करूनच वापरावे. याकरिता कृषी कार्यालयातून माहिती घ्यावी किंवा कर्मचाऱ्यांकडून बीज प्रक्रिया करून घ्यावी. प्रत्येक गावाला दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. २० गावात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. अत्याधुनिक पद्धतीने भात पिकाचे लागवड करावी. पऱ्हे घालायला घाई करण्यापेक्षा रोवणी करण्याकरिता घाई करावी, कमी दिवसाचा पऱ्हा लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. श्री व चतु:सूत्री पद्धतीचा अवलंब करून रोवणी करावी. मार्गदर्शनाकरिता सदैव आमची टीम तुमच्या सोबत असल्याचे अरुण रामटेके यांनी स्पष्ट केले. बांधावर खत योजना सुरु आहे. जैविक शेतीची जोड धरावी. हवामानाचा अंदाज लक्षातघेऊनच धानाचे वाण निवडावे आदी बाबींची विस्तृत माहिती सभेत दिली. सभेला मंडळ अधिकारी, कर्मचारीगण, पत्रकार व जागृत शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी बियाणे तपासूनच खरेदी करावे
By admin | Updated: June 10, 2014 23:53 IST