मुखरू बागडेलाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वाढते तापमान, त्यातच वीज भारनियमन अशा स्थितीत शेतातील धान पीक पाण्याविना शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वाळत आहे. मात्र विहीर, बोअरवेलमध्ये पाणी असतानाही विजेअभावी सिंचन करणे कठीण जात आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा विजेचा जबर झटका बसत आहे. त्यामुळे पुन्हा धान पीक नको रे बाबा...! असे शेतकरी म्हणत आहेत.या वर्षी धान पिकाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. संपूर्ण फेब्रुवारी महिना थंडीत गेला. खताचा व मजूर टंचाईचा सामना करीत अधिक पैसे मोजून रोवणी केली. मार्च महिना उजाडला आणि अर्ध्यात तापमानाने उच्चांक गाठला. पाण्याची पातळी खालावली. अशातच अघोषित भारनियमनाने सात दिवस पाठलाग केला. जमिनीला भेगा पडल्या. धान पिकाला गर्भावस्थेतच पाण्याचा ताण पडला. आज-उद्या म्हणता-म्हणता हप्ता गेला. अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांचा घात केला. जेमतेम पाणी आहे, असे शेतकरी सावध झाले आहेत. अधिकची जोखीम पत्करून कमी पाण्यात शेतकरी धान पीक घेण्यासाठी आता घाबरलेला आहे. पाणी आहे पण वीज नाही ही मूळ समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसली आहे. धान पिकापेक्षा तितकाच नफा देणारे एखादे दुसरे पीक घेतलेले बरे, असे शेतकरी सांगत आहेत. शेतकरी प्रशांत सागर यांच्या शेतातील एक एकर धान वाळत आहे.
मका पिकाची होणार अधिक लागवड - वीज व पाण्याचे संकट अनुभवता भविष्यात लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात भाजीपाला, कडधान्य, मका यासह कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकरी वळणार आहेत. पाण्याशिवाय शेती शक्य नाही. कमी पाण्याची शेती पिके काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शासन सुद्धा ठिंबक सिंचन सुविधाकरिता सकारात्मक आहे.