खरीप हंगामात मृग नक्षत्राला मोठे महत्त्व आहे. या नक्षत्रात पेरणी झाली तर उत्पादनातही वाढ होते. त्यामुळेच अनेक शेतकरी मृग नक्षत्रात पेरणीला भर देतात. मागील वर्षीपासून सुरू असलेल्या काेरोना प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याहीवर्षी काेरोनाचे सावट असताना शेतकऱ्यांनी महिन्याभरापासून खरिपाची तयारी सुरू केली आहे. आजघडीला पेरणीसाठी शेत जमीन सज्ज असताना पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
यावर्षी जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात खरीप लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र आहे. यामध्ये १ लाख ९३ हजार ७०० हेक्टरमध्ये धान तर १३ हजार ८०० हेक्टरमध्ये तूर पिकाची लागवड होणार आहे. जिल्ह्यात साधारणतः ५ टक्के शेतकऱ्यांकडे पाण्याची साधने आहेत. अशा शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. तर उर्वरित शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जमिनीत ओलावा नाही. जमिनीत ८० ते १०० मिमी. पावसाचा ओलावा असल्याशिवाय पेरणी करण्याला मर्यादा येत आहेत. यावर्षी बी-बियाणे, रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली. परंतु, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तथापि, पेरणीसाठी सज्ज झाला असून १५ जूनपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पावसाचा अंदाज असून त्यानंतरच पेरणीला प्रारंभ करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बोनससाठी तारीख पे तारीख
खरीप हंगाम सुरू झाला तरी मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे बोनस राज्य सरकारने अद्याप दिले नाहीत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सुमारे १४०० कोटींचा बोनस शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. बोनस आज मिळेल, उद्या मिळेल, लवकरच मिळेल, असे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे पुढारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. महाग झालेले बी-बियाणे, रासायनिक खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता पैशांची गरज आहे. परंतु, सरकारकडून बोनस बाबत आश्वासने देऊन बोळवण केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.