साकोली : शेतकऱ्यांना उन्हाळी भात बिजोत्पादन तंत्र विकसीत करुन स्वत:चे बियाणे स्वत: तयार करावे, जेणेकरुन अधिक उत्पन्न देणारे मध्यम बारिक दाण्याचे पीक घेता येईल, असे आवाहन वरिष्ठ भात पैदासकार प्रा. जी. आर. शामकुंवर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र साकोलीच्यावतीने सिरेगाव टोला येथील ग्रामपंचायतीत उन्हाळी भात बिजोत्पादन तंत्रज्ञान आणि रबी पिकाचे व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरेगाव टोलाचे सरपंच गोवर्धन संग्रामे, ग्रामपंचायत सदस्य अनिल बाळबुध्दे, कृषी संशोधन केंद्राचे सहायक प्रा. आर.एफ. राऊत, किटक शास्त्रज्ञ डॉ. बी. एन चौधरी हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, किडींना साधारण प्रतिकारक असे नविन भाताचे पिडीकेव्ही किसान, पिकेव्ही गणेश, साकोली ३०-३९ हे वाण, भात पिकावर येणारे रोग व त्यांचे नियंत्रणाचे उपाय यावर मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी सर्व पिकांच्या पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करुन लागवड करण्याचा संदेश दिला. तर प्रा. आर. एफ. राऊत यांनी उन्हाळी भात, हरभरा, गहू, लाखोरी या पिकाच्या लागवडीबद्दल डॉ. बी. एन. चौधरी यांनी उन्हाळी धान व रबी पिकावरील किडीच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल बाळबुध्दे यांनी नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादन वाढविण्यावर भर देण्याचे सांगितले. गोवर्धन संग्रामे म्हणाले, अशा प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे सांगितले. संचालन प्रा. आर. एफ. राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी डी. बी. धरमपाली, एम. एम. महल्ले, कृषी संशोधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी बियाणे स्वत: तयार करावे
By admin | Updated: December 16, 2014 22:48 IST