खेमराज डोये ।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : विधानसभा निवडणूक आणि धान कापणीचा हंगाम एकच आल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा टंचाईचा सामना करावा लागला. त्यातच मजुरांचा खर्च मशीनपेक्षा दुप्पट असल्याने चौरास भागात शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरलाच अधिक दिसत आहे. शेतशिवारात सध्या हार्वेस्टरची घरघर सुरू असून भात कापणीच्या कामाला दिवाळीच्या तोंडावर वेग आला आहे.भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा. निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. विविध समस्यांचा सामना करीत आता धान कापणीला आला आहे. हलक्या धानाची कापणी सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे कोणी मजूर कामावर यायला तयार नव्हते. सर्वच जण प्रचारात आणि रॅलीत मग्न असल्याचे दिसत होते. तसेही गत काही वर्षापासून मजुरांचा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदा तर निवडणुकच होती. अशा परिस्थितीत आता शेतकरी यंत्राची मदत घेत आहे. परप्रांतातून आलेले हार्वेस्टर सहज उपलब्ध होत आहे. कमी वेळात भाताची कापणी होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरलाच दिसत आहे. त्यातही मजुरीचे दर आणि हार्वेस्टरचे भाडे यात चांगलीच तफावत आहे. हार्वेस्टर स्वस्त पडत असल्याने शेतकरी मशीननेच भात कापणी करीत आहे.धान पीक साठविणे आणि वाळविण्यासाठी शेतकऱ्यांना ताऱ्यावरची कसरत करावी लागते. मशीनद्वारे भात पिकाची कापणी केली तर शेतकऱ्यांना चार दिवस शेतात, रस्त्यावर धान्य सुकवावे लागते. नंतर ते घरी आणून साठवावे लागतात. याउलट मजुरीने धान कापले तर कापणीचा, धान बांधाईचा खर्च हार्वेस्टरपेक्षा दुप्पट येतो. हार्वेस्टर एकरी ८०० ते दोन हजार रूपये भाडे घेत आहे. मजुरीसाठी एका एकराला साधारणत: पाच हजार रूपये खर्च येत आहे. त्यामुळे शेतकरी मशीनलाच पसंती देताना दिसत आहे.ग्रामीण भागात आता निवडणुकीनंतर कापणीच्या कामाला वेग येणार असून बहुतांश शेतकरी हार्वेस्टरची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पवनी तालुक्यातील चौरास भागात दिसून येत आहे.धान खरेदी सुरू झाली असती तरभंडारा जिल्ह्यात अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तर शेतकºयांना सरळ धान खरेदी केंद्रावर नेता आला असता. त्यातून साठवणुकीचा खर्च वाचला असता परंतु आता धान खरेदी केंद्रच सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या घरी धान साठविण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
धान कापणीसाठी शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST
भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा. निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. विविध समस्यांचा सामना करीत आता धान कापणीला आला आहे. हलक्या धानाची कापणी सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे कोणी मजूर कामावर यायला तयार नव्हते. सर्वच जण प्रचारात आणि रॅलीत मग्न असल्याचे दिसत होते.
धान कापणीसाठी शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरला
ठळक मुद्देढगाळ वातावरणाची धास्ती : मजुरीचा खर्च मशीनपेक्षा दुप्पट