पालोरा (चौ.) : नगदी पिक म्हणून हळद या पिकाची ओळख आहे. पिकात वाढ व्हावी म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र पवनी येथील कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून अनुदान मिळाले नाही. सदर पिकाचे अनुदान मिळावे म्हणून परिसरातील शेतकरी तालुका कृषी कार्यालयाचे उबंरठा झिजवित आहेत, मात्र त्यांना अजुनपावेतो अनुदान मिळाले नाही.शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी व्हावा, शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून प्रशासनाकडून शेतकऱ्यांकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. पवनी तालुका धान पिकाचा म्हणून प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकरी धान पिक जास्त प्रमाणात घेतात.मात्र धान पिकाला लागणारा जास्त खर्च व पिकाला मिळणारा अल्प भाव त्यामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडला होता. प्रशासनाच्या अनुदानामुळे व विविध योजनांच्या सहाय्याने परिसरातील शेतकरी नगदी पिक हळद पिकाकडे वळले आहेत. पवनी तालुक्यातील पालोरा, लोणारा, बाम्हणी, वलनी, शीमनाळा, जुनोना, भेंडाळा, आसगाव परिसरात मोठ्या प्रमाण हळदीचे पिक घेतले जात आहे. हळद पिकासोबत अन्य पिकेही घेतली जात आहे. मात्र प्रशासनाकडून मिळणारा अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जुनोना येथील दिलीप मोहरकर, सुनिता वंजारी, पंढरी भुरे, विठ्ठल मोहरकर, ईश्वर वंजारी, युवराज मोहरकर, ज्ञानेश्वर वंजारी, भूषण भुरे, जागेश्वर वैद्य, गोपू वैद्य, पुरुषोत्तम मेंढे, अनिल वैद्य, मुरलीधर वंजारी आदी शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
शेतकरी हळद पीक अनुदानापासून वंचित
By admin | Updated: October 22, 2014 23:14 IST