सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी पीककर्जाची उचल करतात; परंतु बँकेच्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. कागदपत्रांची जुळवाजुळव करून बऱ्याच शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगाव येथे सादर केले आहे. आज होईल, उद्या होईल असे सांगत व्यवस्थापकाने बरेच अर्ज वेटिंगवर ठेवले आहेत. ऐन पीककर्ज देण्याच्या वेळी व्यवस्थापक रजेवर गेले त्यामुळे बरेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही पीककर्ज दिले नाही आणि ऐन वेळेवर सुटीवर गेल्याने आता कर्ज कोण देणार, असा प्रश्न पडला आहे. याबाबत बँकेत चौकशी केली असता २६ जुलैपर्यंत व्यवस्थापक श्रीवास्तव रजेवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आम्हाला कर्ज देता येत नाही, असे बँकेतील इतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षीसुद्धा हीच गत होती. जुलै महिन्यात कर्ज मिळणे कठीण आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर देण्याची सूचना केली असतानासुद्धा व्यवस्थापकामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शेतकरी पीककर्जापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST