जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : तंटामुक्त गाव समितीची बैठक भंडारा : तंटामुक्त गाव मोहिमेची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी याकरीता तहसिलदार आणि पोलीस ठाणे अधिकारी यांनी प्रत्येक महिन्याला बैठका घ्याव्यात, तसेच तहसिलदार आणि पोलीस ठाणे अधिकारी यांनी दौऱ्यांचे वेळी तंटामुक्त गांव समितीला तंटे सोडविण्यासाठी मार्गदर्शन करुन सहकार्य करावे. यासाठी उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले. महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम सन 2015-16 करीता जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी धिरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवरकर, भंडाराचे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, डी.पी. तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, उपअधीक्षक (गृह) पी.पी. धरमशी, उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती शेंडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, तंटामुक्त झालेल्या गावांना शासनाकडून १२ कोटी ६८ लक्ष ५० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात आले आहे. अजुनही ग्रामपंचायतीकडे बरीच रक्कम शिल्लक असल्याचे दिसून येते. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शिल्लक असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कामावर गावाच्या विकासाकरीता तात्काळ खर्च करण्यासाठी ग्राम पंचायतीचे सचिवांना निर्देश देण्यास सांगितले. महसूल अधिकाऱ्यांनी महसूली तंटयांचा निपटारा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना सूचना केल्यात. प्रास्ताविकात दिलीप झळके यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेचे महत्व पटवून देतांना सन २०१२-१३ या वर्षापर्यंत जिल्हयातील सर्वच ग्राम पंचायती तंटामुक्त झालेल्या आहेत. जिल्हयातील तंटे मिटविण्याचे प्रमाणे ९० टक्के असून मोहिम राबविण्याचे काम सातत्याने सुरुच आहे, अशी माहिती या बैठकीस तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तंटे सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज
By admin | Updated: October 14, 2015 00:48 IST