भंडारा : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर गजबजू लागला. शाळा सुरू होण्याचा हा दुसरा आठवडा होता. मात्र ज्या प्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी थर्मल स्कॅनिंगसह फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा नियमित वापर होत असल्याचेच पाहणीतून दिसून आले.
या संदर्भात लोकमत चमूने भंडारा शहरातील काही शाळांचे अवलोकन केल्यानंतर ही उत्तम बाब निदर्शनास आली. विद्यार्थी शाळेत प्रवेश केल्यानंतर त्यांची थर्मल स्कॅनिंग केली जाते. पालकांच्या संमतीनंतरच या विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतही करण्यात आले. कुठलाही विद्यार्थी किंवा शिक्षक विना मास्क फिरताना आढळून आले नाही. रविवारी सुटीचा दिवस असल्याने वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रार्थनेच्या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य दक्षता घेण्यात आल्याचे दिसून आले. गट क्रमाने विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येत असल्याचेही यावेळी दिसून आले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वस्व खबरदारी घेण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह प्रत्येक विद्यार्थ्यांने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.
-केशर बोकडे, मुख्याध्यापिका शास्त्री विद्यालय, भंडारा
बऱ्याच प्रतीक्षेनंतर शाळांची घंटा वाजला. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्याने कोरोना संकटकाळात त्यांची काळजी घेतली जात आहे. नियमांचे पालन केले जात आहे.
-शाहिद कुरैशी, क्रीडा शिक्षक, कटकवार वि. साकोली
दहा महिन्यानंतर चिमुकले विद्यार्थी शाळेत परतले. विद्यार्थ्यांचा हा आनंद कायम राहावा यासाठी नियमांचे पालन करून विद्यार्जन सुरू आहे. यासाठी पालकांचेही सहकार्य लाभत आहे.
-सतीश धुर्वे, सहायक शिक्षक, आमगाव