घोडायात्रेची सांगता : लाखो भाविकांनी घेतले अड्याळच्या हनुमंताचे दर्शनअड्याळ : विदर्भात घोड्याची यात्रा म्हणून प्रख्यात असलेल्या अड्याळ येथील यात्रा महोत्सवात सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात सर्वधर्मिय आठ जोडपी विवाहबद्ध झाले. घोडायात्रेच्या निमित्ताने २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री बालाजी रथयात्रा श्रीमद भागवत सप्ताह श्रीरामनवमी उत्सव हनुमान जयंती उत्सव यासह अन्य कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या वैशिष्टपूर्ण घोडायात्रेला संपूर्ण विदर्भातील लाखो भाविकांनी येथील जागृत हनुमंताचे दर्शन घेतले. या यात्रेचा भाग म्हणून अड्याळ येथे १९९६ पासून विवाह सोहळ्याची परंपरा वाजत गाजत सुरू असून गेल्या १९ वे वर्षापासून ग्रामविकास एकात्मता समितीच्या वतीने आजपर्यंत ३४० जोडपे विवाह बंधनात अडकले.विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार रामचंद्र अवसरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नाना पटोले, डॉ. हेमकृष्ण कापगते, दुध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक, उपसभापती शिवशंकर मुंगाटे, डॉ.भैय्यामोहन क्षिरसागर, हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्करराव पोटवार, मधुकर निकुरे, देविदास नगरे उपस्थित होते. संचालन प्रा. ईश्वर खंडाईत, आभारप्रदर्शन धनंजय मुलकलवार यांनी केले. यावेळी उपस्थित अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विवाह सोहळ्यातील नवदांपत्यांना ग्रामपंचायत, अड्याळ पोलीस ठाणे, हनुमान मंदिर समितीकडून सहउपयोगी भेटवस्तू देण्यात आलेत. यावेळी किशोर देवयीकर महाराज, अशोक सलुजा, सुर्ववंशी महाराज व बुद्ध वंदना मुनेश्वर बोदलकर यांनी वाचन केले. या सात दिवस चालणाऱ्या महायज्ञात हभप अनिल अहेर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन या सप्ताहात पर्वनी ठरली. तसेच सातही दिवस हनुमान मंदिरात महिला मंडळातर्फे सुंदरकांड, ग्रामसफाई, भजन जागरण, काकड आरती, हरिपाठ, घटस्थापना इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)
सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: April 5, 2015 00:47 IST