विद्यार्थी वंचित : सामाजिक न्याय विभागातील प्रकारतुमसर : सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात सात शासकीय वसतीगृह आहेत. येथे प्रेवश मिळविण्यासाठी संगणक प्रणालीने प्रवेश निश्चित केला जातो. मात्र, या प्रणालीत त्रुट्या असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत तो खोडा बनला आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांची वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया रखडल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यात राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण सात शासकीय मुलांचे वसतीगृह सुरु आहेत. यात भंडारा शहरात दोन, तुमसर, साकोली, लाखनी, पवनी, लाखांदूर येथे प्रत्येकी एक वसतीगृह आहे. या वसतिगृहात इयत्ता आठ ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात येते. प्रत्येक वसतिगृहाची प्रवेश क्षमता ७० ते ७५ इतकी आहे. ग्रामीण परिसरातुन तालुका किंवा जिल्हास्थळी विद्यार्थ्यांना विनामुल्य निवास तथा भोजनाची सोय व्हावी म्हणून ही वसतीगृह राज्य शासनाने सुरु केली. शैक्षणिक सत्रापासून प्रवेश अर्ज भरणे सुरु झाले आहे.सन २०१४ या शैक्षणिक वर्षापासून पारदर्शी प्रवेशाकरिता राज्य शासनाने आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. हे दुसरे वर्ष आहे. मागील सत्रात दोन महिने विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशाकरिता प्रतीक्षा करावी लागली होती. त्याची पुनरावृत्ती यावर्षी पुन्हा होत आहे. आॅनलाईन प्रक्रिया पुणे येथून राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे येथे डोकेदुखी ठरत आहे. आॅनलाईन प्रक्रियेतील त्रुट्यांमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब लागत आहे.तुमसर येथे २३ जागेकरिता प्रवेश देणे आहे. परंतू ७५ विद्यार्थ्यांना प्रवेश अपेक्षित आहे. येथील अधीक्षक एस.एम. आबोजवार व जिल्हा समाज कल्याण अधिकारी (राज्य) देवसुदन धारगावे हे दोघेही रजेवर आहेत. या शैक्षणिक सत्रात २६ जूनपासून प्रवेश प्रक्रिया राबविणे सुरु करण्यात आले. परंतु किमान दोन महिने या प्रक्रियेला कशी लागतात हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)सध्या प्रवेश अर्ज भरणे सुरु असून पुण्यावरून सर्व प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन झाली आहे. काही तांत्रिक त्रुट्यामुळे मागील वर्षी प्रवेशाकरिता विलंब झाला. प्रवेशाकरिता स्थानिक कार्यालय काहीच करू शकत नाही.- ए. डब्लू. जीवंडे, अधिक्षीका, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, भंडारा.
वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत आॅनलाईनचा खोडा
By admin | Updated: July 21, 2015 00:37 IST