भंडारा : दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेसच्या उपयोगीतेमुळे तिला 'लोकवाहिनी' हे बिरूद मिळाले आहे. मात्र याच लोकवाहिनीतील अस्वच्छतेमुळे आता प्रवशांचा जीव गुदमरत असल्याचे वास्तव आहे. एसटी बसेसच्या स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे वातानुकूलित सेवा देण्याची वल्गना करत असले तरी प्रत्यक्षात एसटी बसेसची स्थिती अतिशय गंभीर आहे.ग्रामीण भागासह मोठमोठी महानगरामध्ये जाण्यासाठी भंडारातुन एसटी बसशिवाय कोणताच दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबुन आहे. तिकिटाचे दर वाढले म्हणून कुरकुर करणारा सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटीबसला प्राधान्य देतो. मात्र बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमुळे नाईलाज होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक फोफावली अशी ओरड सर्वच स्तरांतुन केली जाते. याला बऱ्याच अंशी एसटी महामंडळाचा कारभार जबाबदार असल्याचे दिसते. ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीबसकडे कोणाचे लक्ष नाही. या बसमधुन प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येतात.ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर हा वास सहन होत नसल्याने सातत्याने उलट्या होतात. याला चांगला पर्यायी शब्द प्रवाश्यांनीच शोधुन काढला आहे. उलट्या होण्यास 'एसटी लागते' असे म्हणतात. महामंडळाच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी प्रवाशांनीच आपली समजूत काढली आहे. काहींना एसटीतून अशा स्थितीत प्रवास करणे शक्यच होत नसल्याने अवैध प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरूवात होतो. खिडक्या ह्या उलटीने माखलेल्या असतात. खर्ऱ्याची पन्नी, व्हेपर्स, चिप्स खाऊन त्याचे पॉकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच मनसोक्त झुरके घेताना दिसतो. गर्दीचे खचाखच भरलेल्या गाडीमध्यें हा धुर कोडल्याने सर्वांनाच धुम्रपान घडते. हा प्रकार थांबविण्यासाठी तसदी गाडीतील वाहक कधीच घेत नाही. सार्वजनिक ठिाकाणी थुंकणेही कायद्याने निषिध्द आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. बसमध्ये बसून धूम्रपान केले अथवा थुंकले, कचरा टाकला म्हणून कोणालाही आजपर्यंत दंड झाला नाही. त्यामुळे प्रत्येक जण बेफामपणे कोणाचीही पर्वा न करता एसटी बस रंगविण्याचे काम प्रवासदरम्यान करतो. कर्तव्यावर असलेल्या वाहकाने पुढाकार घेऊन अशा प्रवाशांची तक्रार केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतुद आहे. मात्र वाहक अशी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळेच लोकवाहिनी असलेली एसटीबस आज घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. बसच्या तुटक्या सीट, फुटलेल्या खिडक्या ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आज सर्वत्र वैयक्तीक स्वच्छतेचा नारा दिला जात असताना एसटी महामंडळाला अजून तरी जाग आलेली दिसत नाही. एसटीसाठीसुध्दा स्वतंत्र स्वच्छता अभियान राबविण्यासाठी गरज आहे. बसेसच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महामंडळाप्रमाणेच प्रवाशांवरही अवलंबून आहे. मात्र नियमित स्वच्छता दिसल्यास प्रवासीसुध्दा ती घाण करताना निश्चित कचरतील, त्यासाठी महामंडळाने एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी )
लोकवाहिनी बरबटली घाणीने
By admin | Updated: November 30, 2014 22:59 IST