भंडारा : जिल्ह्यात पहिल्यांदाच झालेल्या मोहाडी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला तर लाखांदूर नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लाखनी नगरपंचायतीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापण्यासाठी दोन उमेदवारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. या निकालामुळे काँग्रेस व भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह पसरला आहे.५१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत २४ काँग्रेस, १९ भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, चार अपक्ष अशा जागा जिंकल्या आहेत. मोहाडीत काँग्रेस १२, भाजप ३, राकॉ व अपक्षाला प्रत्येकी १ जागा, लाखनीत काँग्रेस ७, भाजपचे ६, राकॉ व अपक्षाला प्रत्येकी २ जागा तर लाखांदुरात भाजप १०, काँग्रेस ५, राकॉ व अपक्षाला प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत लाखनीत ७३, मोहाडी व लाखांदुरात प्रत्येकी ९९ असे २७१ उमेदवार रिंगणात होते. मोहाडीत काँग्रेसचा दणदणीत विजय मोहाडी : काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी या पक्षांनी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या मोहाडी नगरपंचायतीवर काँग्रेसने दणदणीत विजय प्राप्त करून बहुमताच्या पलिकडेही विजय संपादन केला. काँग्रेसचे १२, भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष एक असे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत भाजपकडून राज्यस्तरावरचे नेते प्रचाराला आले होते. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल, राजेंद्र जैन यांनी मोहाडी पिंजून काढली. भाजप उमेदवारासाठी आमदार चरण वाघमारे मोहाडीत तळ ठोकून होते. काँग्रेसकडून एकही मोठा नेता प्रचाराला आला नसतानाही आशिष पातरे व सुनिल गिरीपुंजे या या स्थानिक नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळून विजय मिळविला. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी भाजपचे दावेदार असलेल्या उमेदवाराला केवळ ३८ मते मिळाली. बहुतांश प्रभागात भाजप तीन चार क्रमांकावर गेली. विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मते देणाऱ्या मोहाडीतील नागरिकांनी यावेळी भाजपला सपशेल नाकारले. या निवडणुकीत राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे त्याचा फटका बसला. शिवसेना व मनसेला खातेही उघडता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा सोनाले जोशी यांनी काम पाहिले. त्यांनी विजयी उमेदवारांच्या निकालाची घोषणा केली. लाखांदूर नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमतलाखांदूर : पहिल्यांदाच झालेल्या लाखांदूर नगरपंचायतीवर भाजपाने सत्ता काबीज करून स्पष्ट बहुमत मिळविले. यात १७ पैकी भाजपा १०, काँग्रेस ५, राकाँ व अपक्षाने १ जागा मिळविली.नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कसोसीचे प्रयत्न केले होते. राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर उभे असलेल्या उमेदवारांची अपक्षांनी दमछाक केली. मात्र मतदारांनी भाजपाच्या बाजूने स्पष्ट मत दिले. नगरविकास आघाडीने १ उमेदवार निवडून आणला. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांना नाकारले. मागील पंचवार्षिक काळात ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता होती. त्यामुळे विद्यमान सरपंच व सदस्यांना मतदारांनी पसंती दिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.जी. जोशी यांनी काम पाहिले. त्यांनी विजयी उमेदवारांच्या निकालाची घोषणा केली. लाखनीत काँग्रेसला सर्वाधिक जागालाखनी : नवनिर्मित नगरपंचायत निवडणुकात काँग्रेसचे ७, भाजपाचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ व अपक्ष २ उमेदवारांना नगरसेवक म्हणून नगरपंचायतमध्ये संधी मिळाली आहे. काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी, अपक्षाच्या मदतीने काँग्रेसला सत्ता स्थापन करू शकते. या निवडणुकीत लाखनी ग्रामपंचायतच्या माजी चार सदस्यांना नगरपंचायतमध्ये प्रवे श मिळाला. यात धनू व्यास, ईश्वरदत्त गिऱ्हेपुंजे, माया निंबेकर, महेश आकरे यांचा समावेश आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य ज्योती निखाडे हे निवडून आले तर लाखनीच्या माजी सरपंच उर्मिला आगाशे व माजी उपसरपंच दीपक निंबेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी सदस्य किशोर साखरे, अश्विनी भिवगडे, सुनिता खेडीकर यांनाही मतदारांनी नाकारले. ही नगरपंचायत निवडणूक तरुणांना प्राधान्य देणारी ठरली. भाजपाचे कौस्तुभ भांडारकर, अपक्ष विक्रम रोडे या नवतरुणांनी नगर पंचायतमध्ये प्रवेश मिळविला आहे. काँग्रेसचे पदाधिकारी धनंजय तिरपुडे हे निवडून आले. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी आमदार सेवक वाघाये यांच्या जनसंपर्क कार्यालयात जल्लोष केला. माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिल्लोरकर, आरोग्य व बांधकाम सभापती विनायक बुरडे, काँग्रेसचे लाखनी तालुकाध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय उरकुडे यांनी काम पाहिले. त्यांनी विजयी उमेदवारांच्या निकालाची घोषणा केली. (तालुका प्रतिनिधी)लाखनीत दोन मतांची गरज४लाखनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला सात तर भाजपला सहा जागा मिळाल्या. सत्ता स्थापण्यासाठी नऊ मतांची गरज आहे. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असून सत्ता स्थापण्याचा पहिला दावा काँग्रेसचा आहे. यासाठी काँग्रेसला दोन तर भाजपला तीन उमेदवारांची गरज आहे. आता काँग्रेसला राष्ट्रवादी साथ मिळते की अपक्षांची हे पाहणे औत्सुक्याचे ठरणा आहे. भाजपही सत्ता स्थापण्यासाठी समिकरणांची जुळवाजुळव करीत आहे.
मोहाडीत काँग्रेस, लाखांदुरात भाजपचा झेंडा
By admin | Updated: November 3, 2015 02:04 IST