पालांदूर : पावसाचे सावट असूनही जोखीम पत्करत खुल्या जागेत धानमोजणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश पाहता मेंगापूर धान खरेदी सुरू करण्यात आलेली आहे.
पालांदूर परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदी सुरू करण्यात आली. गोदामाच्या क्षमतेपेक्षा अधिक धान खरेदी करीत शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला. भरडाई आदेश होऊन मालाची उचल होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, शासन व प्रशासनाच्या धोरणाने भरडाई आदेश मिलर्सधारकांनी स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे धान खरेदी प्रभावित झालेली आहे. यात शेतकरी नाहक गोवला जात असून त्याच्या सहनशीलतेचा अंत शासन-प्रशासन पाहत आहे.
गत तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या धान्याची नासाडीसुद्धा झालेली आहे. पोती फाटून धान मातीमोल झालेले आहेत. इतकी विदारक परिस्थिती लोकप्रतिनिधींना कळवूनही शासन व्यवस्था सुधारलेली नाही. आता धान खरेदी केंद्रधारकांनी जोखीम पत्करत खुल्या नभाखाली धान खरेदी शेतकऱ्यांच्या साक्षीने सुरू केलेली आहे. धान खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना नियमित मिळत आहेत. परंतु, अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची धानमोजणी अजूनही शिल्लक आहे. ३१ मार्च ही धानमोजणी ची अंतिम तारीख ठरलेली आहे. अशा प्रसंगात शेतकऱ्यांचे धान मोजणे निश्चितच आवाक्याबाहेरचे दिसते. लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने शेतकरी हतबल ठरलेला आहे.
गणराजबाबा सुशिक्षित बेरोजगार धान खरेदी केंद्र मेंगापुरांतर्गत २८ जानेवारीपर्यंत ८६१ शेतकऱ्यांच्या २५ हजार ५०८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. यातील ७६५ शेतकऱ्यांचे ४ कोटी २५ लाख ५३ हजार ७८७ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारेसुद्धा लवकर येतील, अशी आशा आहे.
बॉक्स
हमीभावाने धान खरेदीला तीन महिने लोटल्यानंतरही शासनाने धानाच्या भरडाईचे दर अद्यापही निश्चित केलेले नसल्याने धान भरडाईचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शासनाची स्वतःची गोदामव्यवस्था तोकडी असल्याने खाजगी गोदाम व्यवस्थेवर धान खरेदीची मदार आहे. शासनाने किमान शेतकरी हितार्थ तरी एक पाऊल मागे घेत धान भरडाई प्रश्नावर मिलर्सना सकारात्मकरीत्या सहकार्य करणे नितांत गरजेचे आहे. शेजारच्या छत्तीसगढ व मध्य प्रदेश शासनांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील धान भरडाईचे नियोजन आखणी झाल्यास निश्चितच महाराष्ट्रातील भरडाईचा प्रश्न निकाली लागेल, यात शंका नाही!