नागरिकांनी काढली रात्र उकाड्यात : वीज कंपनीविरूध्द नागरिकांचा आक्रोशभंडारा : वीज वितरण कंपनीने भारनियमनाच्या वेळा निर्धारित केल्या असल्यातरी याव्यतिरिक्त शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणार्या केबलमध्ये बिघाड आला. त्यामुळे गडेगाव उपकेंद्रातून पाच फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचा फटका भंडारा व लाखनी तालुक्यातील हजारो नागरिकांना बसला. रात्री अचानक ब्रेकडाऊन झाल्याने जवळपास ३२५ गावातील नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली. यासह अशोक लेलॅण्ड, एमआयडीसी परीसरातील कारखाण्याचे काम पुर्णत: ठप्प पडले होते. ब्रेकडाऊनचा नागरिकांनी वीज वितरण कंपनीविरूध्द संताप व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात दि. ३ जूनपासून जीवघेणे भारनियमन सुरु केले आहे. परिणामी उन्हाच्या चटक्यासोबत भारनियमनाची झळ नागरिकांच्या मानगुटीवर बसली आहे. राज्यशासनाच्या भारनियमन मुक्तीचा फज्जा उडाला आहे. पारा ४७ ते ४८ अंशांवर असताना काल, शनिवार रोजी रात्री जिल्ह्यात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली नसतानाही अचानक ३३ के. व्ही. गडेगाव उपकेंद्रातील वीजपुरवठा खंडीत झाला. परीणामी गडेगाव उपकेंद्रातंर्गत असलेल्या लाखनी, सालेभाटा, पोहरा, एमआयडीसी गडेगाव, व धारगाव या पाच फिडरमार्फेत जवळपास ३२५ गावांचा वीज पुरवठा बंद झाला होता. रात्री ९ वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला. वीज अधिकार्यांनी रात्रभर नादुरुस्त केबलची शोधाशोध करुन केबल दुरुस्ती केली. तोपर्यत पहाट उजाडली. अखेर नऊ तासानंतर वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला. दरम्यान लाखनी व भंडारा तालुक्यातील नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली. उकाड्यात वीज पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणूकीपूर्वी दररोज नियमित असणारी वीज आता कशी का? वारंवार खंडित होत आहे, याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)
‘ब्रेकडाऊन’ : ३२५ गावे अंधारात
By admin | Updated: June 8, 2014 23:42 IST