आरोग्य विभागात खळबळ : कारवाईकडे नजराभंडारा : जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडलेल्या प्रकरणांची माहिती मुंबई मंत्रालयात पोहोचणार असल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी येथे गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया प्रकरण आणि भंडारा तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरण, ही दोन्ही प्रकरणे सोमवारी मंत्रालयात पोहचती करण्यात येणार आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य विभागाचे मंत्री डॉ. दिपक सावंत जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी याप्रकरणांकडे जातीने लक्ष देऊन अहवाल सादर करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहे. त्या संबंधाने आष्टी येथील शस्त्रक्रिया प्रकरण आणि पहेला येथील बयाण गोपनियता भंग प्रकरणाचा तपशिल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी मंत्रालयात पाठविण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. आरोग्य विभागाच्या घडामोडी वरिष्ठांकडे पाठविण्याच्या सुचना आहेत. सदर प्रकरणात लहान कर्मचाऱ्यावर कारवाई करुन प्रकरण मिटले असा सुटकेचा नि:श्वास सोडणाऱ्यांना मंत्रालयात पोहोचणाऱ्या तपशिलाचा धसका बसणार आहे. ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. चौकशी झाल्यास या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)
‘ती’ दोन्ही प्रकरणे पोहोचणार मंत्रालयात
By admin | Updated: April 25, 2016 00:26 IST