भंडारा : पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने निघालेला एक काळवीटाचा सालेबर्डी शिवारातील डबक्यातील चिखलात पाय फसल्यामुळे मृत्यू झाला. त्यापूर्वी काळविट चिखलात फसून असल्याची माहिती पोलीस पाटील पोमराज लेंडे यांनी वनविभागाला देऊन अधिकारी वेळेत न आल्यामुळे या काळविटाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. भंडारा शेजारी सालेबर्डी गावाच्या शिवारानजिक एक पूल आहे. त्या पुलाच्याकडेला पाण्याने भरला डबका आहे. डबक्यात पाणी असल्याने काळविट पाण्याशेजारी आली. त्या काळविटाने तहान तर भागविली पण तो त्या डबक्यामधील चिखलात रुतून राहिला. दवडीपार बेला येथील पोलीस पोमराज लेंडे मित्राच्या शेतावर गेले होते. तेव्हा त्याच ठिकाणी एक काळविट चिखलात रुतून पडला आहे. तो तडफडतो आहे. अशी वार्ता मिळाली. पोलीस पाटील पोमराज लेंडे मित्र भगवान मते, राजू मते यांना घेवून सालेबर्डी नजीकच्या पुलाशेजारी गेले. त्यांनी चिखलात रुतलेला काळविट निघण्यासाठी धडपड करीत असल्याचे पाहिजे. लगेच पोलीस पाटील पोमराज लेंडे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात कळविले. पण, भंडारा पोलिसांनी वन विभागाला माहिती दया असा सल्ला दिला. लगेच वनविभाग भंडारा यांना घटनेची माहिती दिली. पंरतु वन विभागाचे अधिकारी उशिरा त्या ठिकाणावर आले. पण अधिकारी आले तेव्हा फार उशिर झाला होता. तोवर काळविट चिखलात रुतून मृत झाला होता. मृत झालेल्या काळविट डबक्याच्या पाण्यात तरंगत होता. जीवाच्या आकांताने धडपडणारा काळविटचा असा दुर्देवी मृत्यू झाला. मृत काळविटला बाहेर काढण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी भंडारा येथे घेवून आले. दुसऱ्या दिवशी काळविटचा शवविच्छेदन केला. त्यानंतर त्याला पुरण्यात आले. वन अधिकारी वेळ न घालविता ठिकाणावर आले असते तर कदाचित तृष्णा भागविणारा काळविट पुन्हा उड्या मारत शिवारात निघून गेला असता. (जिल्हा प्रतिनिधी)
काळवीटचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 00:28 IST