भंडारा :भाजपचे सरकार सत्तेवर येताच १५ दिवसातच धानाच्या हमीभावात फक्त ५० रुपये वाढ केली. ही शेतकऱ्यांची सरकारने केलेली थट्टाच आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करुन राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय कृषिमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले.राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी धनंजय दलाल, नाना पंचबुद्धे, अरुण गोंडाणे, वाय.के. हेडाऊ, रामदास शहारे, रवी शर्मा, मो.अशफाक हाजी सलाम, बी.आर. बनकर, व्ही.एल. दिवटे, मोहन खांदाडे, सत्तार खान, बळीराम कुंभलकर, नरेंद्र झंझाड, अज्ञन राघोर्ते, अनंतकुमार बोदेले, हेमंत सोनवाने, मंगेश कडव, विलास खांदाडे, हिरालाल बांगडकर, दिनेश काळे आदी उपस्थित होते. अलीकडे रासायनिक खते, बियाणे, अवजारे व साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली. त्यातच भाजपने २,५०० रुपये समर्थन मूल्य देण्याचे जाहीर करुन जुन्या भावात केवळ ५० रुपये वाढ केली. ही सरकारने केलेली शेतकऱ्यांची थट्टाच आहे, असा आरोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)
भाजपने शेतकऱ्यांची केली थट्टा
By admin | Updated: June 29, 2014 23:47 IST