विसर्जन अन् प्रतिष्ठापना : ढोलताशांचा गजर, बाजारपेठेत वाढली उलाढालभंडारा : कोट्यवधी हिंदुंचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायांचे आज सोमवारी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत आगमन झाले. जिल्ह्यात गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ झाला असून बाजारपेठेतही उलाढाल वाढली आहे.रविवारी महागौरीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास धार्मिक विधीनुसार गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्यात २८० ठिकाणी सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यासह २७४ गावांमध्ये 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. भंडारा शहरात ५५ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यापार्श्वभूमिवर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे.दुसरीकडे मागील तीन आठवड्यांपासून वरूणराजा बेपत्ता असल्याने शेतकऱ्यांची चिंता बळावली आहे. अशा स्थितीत गणेशोत्सवादरम्यान वरूणराजा दमदार हजेरी लावणार काय, अशी आशाही बळीराजा व्यक्त करीत आहे. या दरम्यान गणरायांच्या आगमनामुळे शुकशुकाट असणाऱ्या बाजारपेठेतही रंगत आली आहे. यात लाखोंची उलाढाल होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. (प्रतिनिधी)
बाप्पांचे आगमन...
By admin | Updated: September 6, 2016 00:23 IST