भंडारा : सुमधुर स्वरात गायलेले राष्ट्रगीत, तितकेच समर्पक समूह गीत, सुसज्ज बॅंडपथक, आकर्षक गणवेशातली मुलं, शिक्षक वर्ग.. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रीय सणांना लालबहादूर शास्री विद्यालयाचे पथक जि. प.च्या प्रांगणात राष्ट्रगीतासाठी निमंत्रित केले जाते. गेल्या १७ वर्षांपासून मुलांना सन्मानाने निमंत्रण देण्याची प्रथा जि.प. च्या सामान्य प्रशासन विभागानेही सुरू ठेवली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या प्रांगणात येऊन क्षण अनुभवणारे विद्यार्थीही कमी नाहीत. पाचवी व सहावीच्या बालवयातली ही मुलं मोठी झाली. शिक्षण व नोकरीनिमित्त बाहेरच्या शहरात गेली. पण राष्ट्रभावनेचा तो क्षण पुन्हा वाट्याला यावा, असे प्रत्येकाला वाटतेच. शहरात उच्चशिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांत आकांक्षा साठवणे, मयुरी खलशिंगे, मयुरी वैद्य, चाहूल नागपुरे, अमेय डोंगरे, अभिषेक शहाणे, आशिष रामटेके, सौरभ जांभूळकर, पीयूष निचत, संपदा वझलवार, वेदांत रामेकर, मृणाल पवनकर, चंदन साखरकर, वैभवी पाटील, पीयूष वंजारी अशा एक नव्हे अनेक विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला. राष्ट्राच्या सन्मानार्थ आयुष्यात पुन्हा एकदा या प्रांगणात आम्हाला राष्ट्रगीत गायला मिळावे, अशी भावना व्यक्त करताना माजी विद्यार्थिनी मयुरी खलशिंगे भावुक झाली होती.
प्राचार्या केशर बोकडे म्हणाल्या, शालेयवयात अनुभवलेले क्षण मुलं विसरत नाहीत. त्या आठवणींची शिदोरी घेऊनच मुले नंतरचा प्रवास करतात. त्या क्षणांना, आठवणींना उजाळा देऊन शाळेविषयी मुलांना असणारे प्रेम कायम टिकवून ठेवणे हेच सद्य:स्थितीतल्या शालेय घटकाचे कर्तव्य आहे.
१७ वर्षांपूर्वी काळात केलेले प्रयत्न व मेहनतीचे फळ आताच्या पिढीलाही मिळताय. हा सन्मान या विद्यार्थ्यांचाच नाही तर इतिहासकालीन मन्रो शाळेच्या वास्तूचाही आहे, असे मत शिक्षिका स्मिता गालफाडे यांनी व्यक्त केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या या पथकासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामू शहारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग उपस्थित होता.