तहसीलदारांना निवेदन : बहुजन प्रबोधन मंचची मागणीलाखांदूर : बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरने भारताची जनगणना २०११ ही एस.सी., एस.टी. जाती प्रवर्गाप्रमाणेच ओबीसी जातीची स्वतंत्रपणे प्रवर्गनिहाय जनगणना घोषित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार लाखांदूर यांचे मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविले.सरकारने 'जनगणना २०११' ही धर्म आधारित घोषित केल्यामुळे सर्व धर्मीयांना आपापल्या धर्मीयांची लोकसंख्या कळली. धर्मावर आधारित जनसंख्या घोषित झाल्याने काही लोक असंतुष्ट होऊन समाजात कट्टर धार्मिकता वाढविणारी बयानबाजी करून राजनिती करण्याचे प्रयत्न करीत असल्याचेही म्हटले आहे.बऱ्याच वर्षापासून मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय लोक संघटना व राजकीय मंडळी एस.सी. व एस.टी. प्रवर्गाप्रमाणेच ओबीसींचीही जातीनिहाय जनगणना करून ती घोषित करण्याची मागणी करीत आहेत. या मागणीचा विचार करून संसदेमध्ये ओबीसींची जाती आधारीत जनगणना करण्याचे सरकारने मान्य केले होते. परंतु जनगणना २०११ जेव्हा घोषित झाली तेव्हा मात्र ओबीसी जनसंख्येचा समावेश इतर मध्ये करण्यात आला. आता धर्मावर आधारित जनसंख्या करण्यात आल्यामुळे ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती आहे ते कळत नाही. एस.सी. व एस.टी. प्रमाणेच ओबीसी जातींची स्वतंत्रपणे प्रवर्ग निंहाय जनसंख्या घोषित करून शासन प्रशासनात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व व भागीदारी करण्याचा मार्ग प्रशस्त करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.नायब तहसीलदार विजय कावळे यांनी बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरचे अध्यक्ष अनिल काणेकर तसेच राजेश भुरले यांनी दिलेले निवेदन स्वीकारून ते लवकरच राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)
ओबीसी प्रवर्गाची जनगणना घोषित करा
By admin | Updated: September 6, 2015 00:27 IST