भंडारा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त भंडारा येथील सराफा बाजार तेजीत आला असून, सोन्याच्या खरेदीला झळाळी मिळाली आहे, त्यामुळे सराफा व्यावसायिकांना नोटबंदीनंतर प्रथमच अच्छे दिन आले असल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु नोटबंदीनंतर चलन तुटवडा जाणवू लागल्यापासून सराफा बाजारावर मंदीचे सावट पसरले होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केली; पण ही खरेदी सरासरीपेक्षा अधिक नव्हती. त्यामुळे सराफा व्यवसायात खऱ्या अर्थाने तेजी आलीच नाही; मात्र अक्षय तृतीयेला खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. हवे असलेले दागिने अक्षय तृतियेच्या दिवशी मिळावे, अशी मागणी असते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे किंवा सोन्याचे दागिने भेट म्हणून दिल्यास ते अक्षय्य म्हणजेच कधीही संपत नाहीत, अशी कल्पना आहे. शिवाय या दिवशी कोणताही मुहूर्त पहावा लागत नाही. त्यामुळे किरकोळ खरेदी करणारे ग्राहक थेट सराफा दुकानात येऊन दागिने खरेदी करतात; लग्नसराईचे दिवस असल्याने ग्राहक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दागिणे मिळावे म्हणून बुकींग करून ठेवतात. त्यामुळे सराफा बाजारात लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी) डिजिटल पेमेंटऐवजी रोखीकडे कल नोटाबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण झाल्यानंतरही ग्राहकांचा डिजिटल पेमेंटकडे कल वाढलेला दिसून यत नाही. काही ग्राहक स्वाईप कार्डद्वारे तसेच चेकद्वारे पेमेंट करीत आहेत. तर बहुतांश ग्राहक रोखीनेच व्यवहार करीत असल्याचे दिसून आले.
अक्षय तृतीयेमुळे सोन्याला झळाळी
By admin | Updated: April 28, 2017 00:25 IST