नवीन कार्यारंभ : सोने-चांदीची खरेदी, श्राद्धाचा दिवस, पळस, मोहपानाच्या पत्रावळीत दिला जातो नैवेद्य
राजू बांते मोाहडीवैशाख शुध्द तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय. या दिवशी आपले पूर्वज आपल्या अवती-भोवती वास करतात. अक्षय तृतीयेला पितरांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो. या दिवशी श्राध्द केल्याने आपण अल्पांशाने ऋणातून मुक्त होतो असे मानले जाते. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा अंत होत नाही असा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. वर्षभर कालगणनेमध्ये तिथींचा क्षय होत असतो. पण, वैशाख शुध्द तृतीया या तिथीचा कधीच ऱ्हास होत नाही. म्हणून ही अक्षय तृतीया समजली जाते. या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ न संपणारे मिळते असा समज आहे. या दिवशी नवीन संकल्प केला जातो. दानधर्म केला जातो. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. केलेले कार्य तथा वस्तूची खरेदी त्या अक्षय असतात असे म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस महत्वपूर्ण मानला जातो.देव व पितरांजना उद्देशून जी काही कर्म केली जातात ती अविनाशी असतात. अक्षय असतात. या दिवशी केलेले दान, हवन कधी ही क्षयाला जात नसतात अशी समज आहे. या दिवशी आपले पूर्वज आपल्या सभोवती फिरत असतात. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या प्रतिमेचे पूजनही केले जाते. या दिवशी मातीचे दोन माठ आनले जातात. त्यात वाळा टाकली जाते. त्या वाळयाने पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, आंब्याचे पऱ्हे, पापड, कुरडया आदी वाढले जाते. सुगंधीत पाण्याने भरलेला घट दान केला जातो. काही परिवार पाण्याने भरलेल्या कलशाची पूजा करतात. या दोन कलशांना कर्हा व केली असे म्हटले जाते. ही दोन कलश पूर्वज माता पित्यांचे प्रतीके मानून त्याचे पूजन केले जाते. पुढे कैरी ठेवली जाते. खीर व इतर पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाते. या दिवशी पितरांना उद्देशून अपिंडक श्राध्द करण्याची प्रथा रुढ आहे. हा दिवस अर्धा मुहूर्त मानतात. आपल्या पितरांमुळे आपण या जगात आहोत. श्राध्द केल्याने काही अंशी त्यांच्या ऋणातून मूक्त होता येतो असा समज आहे. आपल्या उन्नतीसाठी पितरांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणूनच या दिवशी अपिंडक श्राध्द व तिलतर्पण केले जाते.या दिवशी अन्नपूर्णेचा जन्म झाल्याचे मानतात. खरे तर हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्याचा, दानधर्म करुन अक्षय पुण्य मिळविण्याचा अक्षय समृध्दी मिळविण्याचा दिवस, विविध धार्मिक कर्म, नवीन कार्याचा शुभारंभ, धन व संपत्तीच्या खरेदीतून साजरा केला जातो. या दिवशी मिळालेले सर्व काही अक्षय राहते यासाठी हीच या मागची लोकभावना दिसून येते. आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादासाठी अक्षय तृतीयेला पळस/ मोहपानाच्या पत्रावळीवर तयार केलेले सर्व अन्नाचे नैवैद्य ठेवतो. त्या नैवद्याला घराच्या छपरावर ठेवले जाते. आपल्या पूर्ववाच्या स्वरुपात येणारा कावळा त्या नैवैद्येला स्पशृ करतो. दोन घास खातो त्या कावळयाचा नैवैधलेला होणारा स्पर्श आशिर्वाद समजला जातो. पण अलीकडे ग्लोबल वार्मिगमुळे कावळयांची संख्या दुर्मिळ होत चालली आहे. अक्षय तृतीयेच्या नैवैद्याला कावळयाने शिवण्यासाठी अक्षरश: ताटकळत बसण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.अक्षय तृतीया शुभकार्यारंभाचा दिवस मानला जातो. या दिवशी लग्न केल्याने वैवाहिक जीवन समृध्दीकडे जाते असे मानतात. या दिवशी ग्रामीण व शहरी भागात अक्षय तृतीतेला लग्नाची रेलचेल बघायला मिळतो. महाराष्ट्र शिवाय छत्तीसगड, बंगाल, ओरीसा, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात मोठया प्रमाणात अक्षय तृतीयेला विवाह संपन्न होतात.अक्षय तृतीतेला सोने, चांदी खरेदी होत असते. सोन्याची वाढलेली किंमत त्यामुळे खरेदी कमी होते. शेतकरी दुष्काळाचा छायेत असतात. त्यामुळे काही गरीब शेतकरी सोने खरेदीऐवजी चांदी झेपेल तेवढया किंमतीत खरेदी करतात.