कोदुर्ली गावालगतच्या ओढ्यावर गत २५-३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. पूल सुस्थितीत असताना गोसी खुर्द प्रकल्प उजवा कालवा विभागामार्फत नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला. धोका टाळण्यासाठी पुलाखाली ॲप्रानचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव बनवून त्याचे एप्रिल-मे २०२१ मध्ये पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता बांधकाम करण्यात आले. उजव्या तीरावर तयार करण्यात आलेल्या विद्युतनिर्मिती प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्याऐवजी उजव्या कालव्यात सोडले जाणार आहे. पाण्याचा प्रवाह जास्त राहणार असल्याने कोदुर्ली ओढ्यामधून पाणी वाहत राहील व पुलाला धोका निर्माण होईल, असा अंदाज बांधून ॲप्रानचे बांधकाम करण्यात आले. घिसाडघाईत बांधकाम पूर्ण करण्यात आल्याने त्यावर खर्च करण्यात आलेले आठ-नऊ लाख रुपये पाण्यात गेल्याची चर्चा पुलावरून दैनंदिन ये-जा करणारे नागरिक करीत आहेत. बांधकामाची सखोल चौकशी व्हावी, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.
कोदुर्ली ओढ्यावरील पुलाचे ॲप्रान कामात गैरप्रकार : दोन महिन्यांत खचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST