भंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांमध्ये जिल्ह्यात ८९ कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. मात्र, शासनाने कंत्राटी पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.राज्य शासनाने आरोग्य विभागाच्यावतीने २०१०-११ मध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरूवात केली. राज्यातील १६ जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात समन्वयक, डेटा एंट्री आॅपरेटर, आरबीएसके फार्मसिस्ट, लेखापाल, एनपीसीबी, एनसीडी (संपूर्ण कार्यक्रम), सिकलसेल तालुका सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील लॅब टेक्निशियन, सांख्यिकी अन्वेषक आदी पदांवर जिल्ह्यात ८९ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, शासनाने या कार्यक्रमांतर्गत कार्यरत ७५ टक्के कंत्राटी पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील निम्याहून जास्त पदे रिक्त आहे. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेत कार्य करताना उच्चरक्तदाब, मधुमेह, लखवा, हृदयरोग, कर्करोग याबाबत जनजागृती व उपचार करून नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्य शासनाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याने या कर्मचाऱ्यांवर भविष्यात उपासमारीचे संकट ओढवणार आहे. (शहर प्रतिनिधी)
८९ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची 'कुऱ्हाड'
By admin | Updated: March 29, 2015 00:53 IST