Gajkesari Rajyog: एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा आरसा मानली जाते. कुंडलीतील ग्रह, त्यांची स्थाने, जुळून येणार विविध प्रकारचे योग हे त्या व्यक्तीच्या जीवनात काय बदल घडवून आणू शकतात, याचा अंदाज जन्म कुंडलीवरून लावला जाऊ शकतो. जन्मकुंडली पाहण्यात ज्या व्यक्ती अतिशय तज्ज्ञ असतात, त्या व्यक्ती कुंडली पाहून त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये, जीवनात घडलेल्या किंवा घडणाऱ्या गोष्टी याबाबत अचूक माहिती देत असतात. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमुळे काही वेळेस राजयोग जुळून येत असतात. ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे राजयोग सांगितले गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे गजकेसरी राजयोग.
जन्मकुंडलीत काही योग असे असतात की रंकाचाही राजा होऊ शकतो. या योगांमुळे जीवनाच्या एका टप्प्यावर अशी स्थिती निर्माण होते की, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. अचानक चक्र फिरतात आणि एखादी व्यक्ती न भूतो अशा सर्वोच्च स्थितीला जाऊन पोहोचते. मग ती स्थिती करिअर, शिक्षण, व्यवसाय, व्यापार, नोकरी अशा जीवनाच्या अनेकविध आघाड्यांवर निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला प्रचंड यश मिळते. प्रगतीच्या अनेक पायऱ्या ही व्यक्ती भराभर चढते. गजकेसरी राजयोग हा अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेला आहे. कोणत्या ग्रहांच्या युतीने गजकेसरी योग जुळून येतो. कुंडलीत कोणते ग्रह कोणत्या स्थानी असले की तो गजकेसरी योग मानला जातो. जाणून घेऊया...
गजकेसरी राजयोग नेमका कसा तयार होतो?
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा गुरू बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह आणि मनाचा कारक चंद्र हे एकाच राशीत असतात, तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. केंद्रस्थानी म्हणजेच लग्न, चौथे आणि दहाव्या स्थानी चंद्रासह गुरु ग्रहाची युती असेल तरी गजकेसरी राजयोग तयार होतो. तसेच जर चंद्र गुरु ग्रहापासून केंद्रस्थानी असेल किंवा गुरुची दृष्टी चंद्रावर पडत असेल तर हा योग तयार होतो. याशिवाय जर गुरु ग्रह चंद्रासोबत त्याच्या उच्च राशीत असेल किंवा चंद्र गुरुसोबत त्याच्या उच्च राशीत असेल तर गजकेसरी राजयोग तयार होतो.
कुंडलीत गजकेसरी राजयोग असेल तर काय होते?
एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत त्याच्या जन्माच्या वेळी हा राजयोग तयार झाला तर त्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होऊ शकते. त्याला एखाद्या राजाप्रमाणे आनंदाची लयलूट करता येऊ शकते. उच्च पदावर स्थान मिळेल. अशा लोकांवर गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो. समाजात खूप आदर मिळतो. या राजयोगात जन्माला आलेल्या व्यक्ती खूप बुद्धिमान, चपळ, धाडसी असतात. प्रत्येक कामात यश मिळू शकते.
गजकेसरी राजयोगाचे नेमके कोणते लाभ मिळतात?
- एखाद्या व्यक्तीच्या लग्न म्हणजेच कुंडलीतील पहिल्या स्थानी शक्तिशाली गजकेसरी राजयोग असेल, तर व्यक्तीला प्रतिष्ठा आणि उच्च पदासोबतच चांगले आरोग्य मिळू शकते.
- एखाद्या जातकाच्या चौथ्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला असेल, तर तो व्यक्ती मंत्री किंवा विद्वानासारखे जीवन जगतो. सर्व भौतिक सुखांचा लाभ प्राप्त होऊ शकतो.
- एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत ७ व्या स्थानी गुरु आणि चंद्राची युती असेल तर ती व्यक्ती कुशल, व्यापारी आणि श्रीमंत बनते.
- एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत नवव्या स्थानी गजकेसरी राजयोग तयार झाला असेल, तर त्या व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळते. अशा व्यक्ती अध्यात्माशी अधिक जोडलेल्या असू शकतात.
- गजकेसरी राजयोग जन्मकुंडलीच्या दहाव्या स्थानी जुळून आला, तर त्या व्यक्तीला करिअरमध्ये प्रगतीसोबतच उच्च पद मिळू शकते. आर्थिक स्थितीही चांगली राहते.
- जन्म कुंडलीत अकराव्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला तर व्यक्तीचा प्रभावशाली लोकांशी संपर्क राहतो. भरपूर पैसे कमवण्यासोबतच, एखाद्याचे सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांशीही चांगले संबंध असतात.
- जन्मकुंडलीत बाराव्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला असेल तर त्या व्यक्तीला परदेशात सुख-समृद्धीचा लाभ होऊ शकतो. यासोबतच, एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतो. वर्तन शुद्ध असते. अशी व्यक्ती ज्ञानी होऊ शकते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.