अंबाजोगाई : बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील नवी आव्हाने पेलू शकतील. यासाठी तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा आंतरभारतीचे राष्ट्रीय महासचिव अमर हबीब यांनी व्यक्त केले.
येथील नगरपरिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आंतरभारती अंबाजोगाई शाखेच्यावतीने राजू जांगीड यांना स्नेहसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी अमर हबीब बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले, तर अध्यक्षा म्हणून प्रा. डॉ. अलका वाळचाळे या उपस्थित होत्या.
अमर हबीब पुढे म्हणाले की, समाजातील तरुणांनी प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून येणारे नवनवे बदल स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे. विभिन्न जाती-धर्म, भाषा, प्रांतातील लोकांना एकत्र आणून माणसांचा समूह निर्माण करण्यासाठी आंतरभारतीची निर्मिती झाली असून, हे सूत्र प्रचलित करण्यासाठी आंतरभारती अंबाजोगाईने स्नेहसंवर्धन पुरस्काराची सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा पुरस्कार हा भारतातील एकमेव असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्नेहसंवर्धन या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित केलेल्या शंकर मेहता, प्राचार्य बी. आय. खडकभावी, प्राचार्य एम. बी. शेट्टी, आनंदराव अंकाम यांच्याहस्ते राजू जांगीड यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा आणि मिलिंद बोकील व अमर हबीब यांनी संपादित केलेले "धुन तरुणाई" हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राजू यांच्या पत्नीचा डॉ. अलका वालचाळे यांनी साडी-चोळीचा आहेर करून सत्कार केला.
वैजनाथ शेंगुळे आणि अनिकेत डिघोळकर यांनी गायिलेल्या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनिकेत दिघोळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पद्माकर घोरपडे यांनी सन्मानपत्र वाचन केले. राजू जांगीड यांचा परिचय संतोष मोहिते यांनी करून दिला. संचालन ज्योती शिंदे यांनी केले, तर आभार दत्ता वालेकर यांनी मानले.
160821\img-20210816-wa0032.jpg
स्नेहवर्धन पुरस्कार वितरण