: मंगळवारी विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा
माजलगाव : नेहमी अडचणीत असलेला जिल्ह्यातील शेतकरी दोन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. सरकार दरबारी वारंवार खेटा मारुन ही विमा मिळत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १ जून रोजी जिल्ह्यातील ११ गावांतील प्रत्येक ग्रामपंचायत समोर एक महिला शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती गंगाभीषण थावरे यांनी दिली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला. मात्र विमा कंपनीने केवळ १३ कोटी विमा वाटप केला आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये सोयाबीन, तूर, कापसाचे मोठे नुकसान झाले. शासनाने या सर्व १०७ गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. शासन नुकसान भरपाई देऊ शकते मग विमा कंपनी विमा द्यायला का टाळाटाळ करत आहे असा सवाल थावरे यांनी केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती वारंवार आंदोलन करत आहे. याचाच एक भाग म्हणून १ जून रोजी माजलगाव तालुक्यातील आनंदगाव, खरात आडगाव, बीड तालुक्यातील मौज, शिरुर तालुक्यातील तिंतरवणी, पाटोदा तालुक्यातील भायाळा, केज तालुक्यातील वरपगाव, अंबाजोगाई तालुक्यातील पुस, परळी तालुक्यातील पोहनेर, वडवणी तालुक्यातील कोटरबन, धारुर तालुक्यातील कान्नापूर, केज तालुक्यातील वरपगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक महिला शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करणार आहे. याच दिवशी भाई थावरे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. विमा कंपनीने विमा न दिल्यास कायदेशीर कारवाई करुन आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा थावरे यांनी दिला आहे.
पाठिंबा द्यावा
कोरोनामुळे मोठे आंदोलन न करताना अकरा गावांतील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केले आहे.