लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली सार्वजनिक पाण्याची टाकी आता जुनी झालीे आहे. ही टाकी जीर्ण झाल्याने कधी पडेल, याचा नेम नाही. या धोकादायक टाकीमुळे अपघाताची शक्यता आहे. तरी ही टाकी पाडून नवीन टाकी बांधावी, अशी मागणी शिवसंग्रामचे धनंजय फिस्के यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून १९८० मध्ये देवीनिमगाव येथे जीवन प्राधिकरणची पाण्याची टाकी उभारली आहे. या टाकीला ४० वर्षे झाल्याने तिला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे जीर्ण झालेली टाकी धोकादायक बनली आहे. आता याच टाकीत पाणी सोडले जात आहे. पण भविष्यात टाकीची अचानक पडझड झाली तर मोठी घटना घडू शकते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. नसता दुर्दैवी घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे धनंजय फिस्के, भागचंद फालके, रियाज पठाण, योगेश जवणे, विनोद पवणे यांनी सांगितले.
....
काय म्हणतात अधिकारी?
गावाला पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. त्याबाबत पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच पाण्याची नवीन टाकी करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी विद्या विधाते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
....
ग्रामपंचायतीनेच टाकी पाडावी
देवीनिमगाव येथे जीवन प्राधिकरण योजनेची पाण्याची टाकी आहे. या टाकीचे आयुष्यमान संपले आहे. ग्रामपंचायतीने टाकी पाडण्याची परवानगी घेऊन पाडावी. आपण ती कधीच हस्तांतरीत केली आहे. आता ते ग्रामपंचायतीचे काम असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता बी. टी. खेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
===Photopath===
250621\nitin kmble_img-20210625-wa0039_14.jpg